
लासलगाव (वार्ताहर) : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. आता मात्र कोरोना कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरू झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणूसंशोधन केंद्रातून हापूस, केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन पहिल्या कंटेनरमधून ३ टन आंबे ९५० पेटीतून अमेरिकेला रवाना झाले.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतातील हापूस आंब्याची अमेरिकेतील नागरिकांना भुरळ पडल्याने आंब्याची मागणी वाढली आहे. दर्जेदार द्राक्षे आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आता आंब्याचे निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे.
झपाट्याने निर्यात होणार
फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण देत युरोपियन महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ साली बंदी घातली होती. त्यामुळे फळांचा राजा असलेल्या हापूसचे आता काय होणार, अशी चिंता होती. पण आता ही चिंता कायमस्वरूपी मिटली असून, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या दिशेने कूच सुरू आहे.
१२ एप्रिल ते २० जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे. लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र येथे आता मसाले व आंब्यावरच विकिरण करून तो निर्यात केला जात आहे.
अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.
निर्यात कोणत्या देशात होते
लासलगाव येथून आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा हापूस सॅन फ्रान्सिस्को,लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविला जाणार आहे.
विकिरण प्रक्रिया म्हणजे काय?
लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निमिर्तीची प्रक्रियाही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.
२०२० आणि २०२१ कोरोना प्रादुर्भावामुळेआंबा परदेशात न गेल्याने विकिरण प्रकिया झाली नाही. यंदाच्या हंगामातील पहिल्या साडेसात मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापाऱ्यांकडून अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे आंबा परदेशात निर्यात करण्यासाठी लासलगाव येथे विकिरण प्रकियेसाठी आला नाही. या वर्षी मात्र ७०० ते ८०० मेट्रिक टन आंब्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती भाभा अणूसंशोधन केंद्राचे विकिरण प्रक्रिया अधिकारी संजय आहेर यांनी दिली.