मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. महाराष्ट्राचा अभिमान असून, उद्या आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा घोटाळा उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हणाच्याची मालमत्ता जप्त झाली त्यानंतरही उद्धव ठाकरे गप्प का? असा प्रश्नदेखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी सोमय्या म्हणाले की, एक डजन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झालीय असे सांगत अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसहीत संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अडसुळ आदींची संपत्ती अटॅच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १९९७-९८ पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली असून, या प्रकरणात स्वतः आणि माझे वकील कोर्टात सगळी माहिती देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता असे सांगत ते म्हणाले की, विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. मात्र, संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले आहेत. रात्री १ वा. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग असे म्हणतात. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, कधीच वेगळी होणार नाही, केंद्रशासित होणार नाही असे म्हणत मुंबईचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले. ही स्टंटबाजी असून, उद्या ऊद्धव ठाकरेंच्या कुटूंबातील आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सोमय्या उद्या नेमका कुणाचा घोटाळा बाहेर काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या गायब झाले होते. पण मुंबई हायकोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते बुधवारी माध्यमांसमोर प्रकट झाले. न्यायालयाच्या निकालानंतरच आपण समोर आल्याचे यावेळी सोमय्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याविरोधातील कटाचा मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला. ठाकरे कुटुंबियांचा घोटाळा बाहेर काढत असल्यानेच माझ्यावर सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.
आयएनएस विक्रांत प्रकरणात एका दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. ५८ कोटींची भाषा संजय राऊत यांनी वापरली होती. या आरोपांमध्ये एकही कागद नाही, पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करायची. दोन-पाच दिवस मीडियाचे लक्ष वेधून घ्यायचे. पण न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, आता न्याय मिळायला सुरुवात झाली आहे, असेही सोमय्या म्हणाले.