Monday, July 1, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमहिलांनो ‘ठेवलेली’ म्हणून राहू नका...

महिलांनो ‘ठेवलेली’ म्हणून राहू नका…

मीनाक्षी जगदाळे

आपल्या अनेक लेखांमधून आपण विवाहबाह्य अनैतिक संबंध आणि त्याचे संसारावर होणारे दुष्परिणाम या विषयावर भाष्य करीत असतो. समुपदेशनला आलेल्या अनेक प्रकरणातून एक साधर्म्य आढळते ते म्हणजे ज्या महिला एकट्या आहेत, घटस्फोटिता अथवा विधवा आहेत, अथवा कोणत्या कारणास्तव

पतीपासून दूर आहेत त्या आपली शारीरिक, मानसिक, भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी आधार म्हणून, सोबत म्हणून, साथ म्हणून विवाहित पुरुषाशी संबंध ठेऊन असतात, ते देखील सर्व मर्यादांच्या पलीकडे जाऊन. महिलांना आपल्या समाजात एकट्याने जीवन जगणे कठीण असते, समाजाला तोंड देणे अवघड असते हेही तितकंच खरं आहे. महिला कमावती नसल्यास आर्थिक मदतीसाठी, मुलं-बाळं असल्यास त्यांना वडील म्हणून कोणाचा तरी आधार, प्रेम किंवा संगोपन मिळावे म्हणून महिला परपुरुषाचा आधार शोधतात.

उत्तम आर्थिक परिस्थिती अथवा मिळवती महिला असल्यास, स्वतःचे घर-दार, नौकरी-व्यवसाय असलेल्या महिला शारीरिक गरजा, मानसिक, भावनिक गरजा यासाठी परपुरुषाचा आधार शोधतात. बहुतांश वेळी हे पुरुष विवाहित, मुलं-बाळं असलेले, एकत्र कुटुंबातील देखील असतात. त्याचप्रमाणे त्यांना कायदेशीर पत्नी असते आणि इतर नातेवाईक, मित्र मंडळी असतातच. अशा पुरुषांच्या आयुष्यात स्वतः स्त्रीने प्रवेश करणे म्हणजे स्वतःहून स्वतःचा अपमान करून घेणे आणि आत्मसन्मान गहाण ठेवण्यासारखे आहे. अशा प्रकारची प्रकरणे हाताळताना विविध अनुभव येतात आणि सर्व महिलांना त्याबाबत माहिती होण्यासाठी या लेखामार्फत आपण एक प्रकरण काल्पनिक नाव वापरून या ठिकाणी नमूद करणार आहोत. जेणेकरून कोणतीही महिला असे चुकीचे पाऊल उचलताना खूप विचार करेल आणि स्वतःचे आयुष्य, भविष्य भरकटण्यापासून सावरू शकेल.

अंजली (काल्पनिक नाव) पतीच्या निधनानंतर स्वतःच्या मुलांचे पालनपोषण करीत उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करणारी महिला. मुलं अत्यंत लहान असताना आणि अंजली तरुण असतानाच पतीचे अपघाती निधन झाले आणि भरपूर पैसा पाणी असून, पतीची प्रॉपर्टी मिळूनसुद्धा एकाकी जीवन जगण्याची वेळ तिच्यावर आली. अशा वेळी तिच्या आयुष्यात विवाहित आणि तिच्यापेक्षा वयाने जास्त मोठा असलेला, अतिशय बुद्धिमान, प्रतिष्ठित व्यावसायिक विजय (काल्पनिक नाव)आला आणि मागचा-पुढचा कोणताही विचार न करता अंजली त्याच्याशी एकरूप झाली. विजयच्या सततच्या बायकांच्या भानगडीनं वैतागून अनेक वर्षांपासून विजयची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी राहत होती. विजय एकटा कमवता, कर्ता असल्यामुळे घरच्यांच्या हातात कोणताही अधिकार नसलेल्या विजयच्या घरात त्याच्या शब्दापुढे जाण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती.

त्यामुळे विजयच्या घरात प्रवेश करून अंजली राजरोसपणे त्याच्यासोबत राहू लागली. कधी दोघेही तिच्या घरी राहत, तर कधी विजयच्या. विजयने आपल्याला घरात स्थान दिले, समाजात आपल्याला घेऊन सगळीकडे तो वावरतो, आपल्या मुलांना बापाचं प्रेम देतो, आपल्याला जीव लावतो, काहीही कमी पडू देत नाही या मानसिकतेमधून ती हे विसरून गेली होती की विजयचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही आणि त्याची बायको, मुलं आजही त्याच्या हक्काची आहेत. बायको, मुलांचा पण त्याच्यावर कायदेशीर हक्क आहे.

पती-पत्नी जरी वेगळे राहत असतील, लांब राहत असतील, त्याबाबत सदर पुरुष काहीही समर्थन देत असेल, त्याच्यात जरी वादविवाद असतील, त्यांच्या जरी कोर्टात केस सुरू असतील, अथवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया सुरू असतील तरीही जोपर्यंत पती पत्नीची कायदेशीर फारकत होत नाही तोपर्यंत पती दुसऱ्या महिलेला कायदेशीर पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही आणि तसे दाखविण्यासाठी, विश्वास संपादन करण्यासाठी, भासविण्यासाठी जर देवळात लग्न करणे, माळा घालणे, परस्त्रीला स्वतःचे नाव वापरू देण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करणे असे उद्योग करून कोणीही विवाहित पुरुष जर तुम्हाला फसवत असेल, तर ते पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि चुकीचं आहे हे लक्षात घ्या.

विजयच्या घरचे हतबल असल्याने आणि त्याच्या सततच्या बायका बदलण्याचा सवयीला वैतागलेले असल्यामुळे त्यांनी अंजलीला न विरोध केला, न तिचा स्वीकार केला. चालतंय ते चालू दे आपल्या सगळ्यांच्या आर्थिक गरजा विजय पूर्ण करतोय ना तर कशाला त्याला विरोध करून त्याचा रोष ओढून घ्यायचा आणि स्वतःचं नुकसान करून घ्यायचं ही मानसिकता विजयच्या घरच्यांची झालेली होती. त्याच्या कुटुंबातील सर्वांच्याच हे अंगवळणी पडलं होत की विजय दर एक दोन वर्षाला नवीन बाईशी संबंध जोडतो, प्रेम प्रकरण करतो, एकावेळी अनेकींना वेड्यात काढण्यात त्याचा हातखंडा आहे, त्यांच्यावर अमाप पैसा उधळतो आणि आपल्या कोणालाही किंमत देत नाही. विजयला काहीही समजवायला, सांगायला गेलं की आपलाच अपमान करतो हे घरातील इतर लोक जाणून होते. विजयच्या कुटुंबीयांचा हाच समज आणि धारणा होती की, शेवटी तो पुरुष आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या बायकांना समजायला हवं की विवाहित असलेल्या पुरुषाशी आपण संबंध कसे ठेवावेत. त्यामुळे अंजलीच्या बाबतीत फक्त धुसफूस करणे, तिच्या मागे तिला अपशब्द वापरणे, टोमणे मारणे, घाणेरड्या शिव्या देणे यापलीकडे घरच्यांच्या हातात काहीही नव्हते. कुटुंबातील कोणाच्याही विरोधाला कोणत्याच बाईबाबतीत विजयने कधीच दाद दिली नव्हती.

केवळ विजय आपला आहे, आपल्याशी प्रामाणिक आहे, आपल्यावर खरं प्रेम करतो आहे, त्याच्या आयुष्यातील बायकोची कमी फक्त आपणच भरून काढू शकतो या मानसिकतेतून अंजली बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत, अपमानित होऊनसुद्धा त्याच्यासोबत राहत होती. अंजलीला स्वतःच्या बायकोबद्दल विजयने अनेक चुकीच्या, वाईट साइट गोष्टी सांगून, तिला भावनावश करून, स्वतःच्या बोलण्यात गुंडाळून तिच्याशिवाय त्याला या जगात कोणीच प्रिय नाही हेच तिच्या मनावर बिंबवले होते. विजयने स्वतःच्या बायकोची बदनामी अंजली जवळ केलेली असल्यामुळे, ती कधीही त्याच्या आयुष्यात परत येणार नाही या विचाराने विजयला ती स्वतःचा नवराच समजून हक्क गाजवीत होती, त्याच्या घरात मालकीण बनून वावरत होती. अंजली सपशेल याच भ्रमात होती की, आता विजय आणि ती आयुष्यभर एकमेकांना साथ सोबत देणार आहेत. विजयची बायको कधी नांदायला येणार नाही आणि विजयचे घरातले पण त्याचं किंवा माझं काही वाकड करू शकत नाहीत. सामाजिक मर्यादांना तर दोघांनी कधीच माग टाकलं होत. अशा पद्धतीने एक नाही दोन नाही तब्बल दहा वर्षं अंजली आणि विजय नवरा-बायकोसारखे आयुष्य जगत होते.

meenonline@gmail.com

(क्रमश:)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -