ठाणे (प्रतिनिधी) : उन्हाळा सुरू होताच शहरात पाणीटंचाईचा प्रश्न उभा राहतो. गेल्या पाच वर्षांपासून सावरकरनगर, करवालोनगर आणि लोकमान्यनगर परिसराला पाण्याचा अनियमित आणि अपुरा पुरवठा केला जात आहे. त्याचे संतप्त पडसाद मंगळवारी उमटले. येथील महिलांनी ठाणे पालिका मुख्यालयावर धडक दिली.
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगरसेवक अमित सरैया, समाजसेवक मयूर शिंदे, संतोष पाटील, माणिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकरी महिलांनी यावेळी ठाणे पालिका मुख्यालयासमोरच मडकी फोडून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, यावेळी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात ठामपा अधिकाऱ्यांनी दीड महिन्यांत येथील पाणीप्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
सावरकरनगर, करवालोनगर, लोकमान्यनगर या भागांमध्ये साधारणपणे ५० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. या भागामध्ये पाण्याचा अनियमित पुरवठा होत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ २ दशलक्ष लिटर्सची एकच पाण्याची टाकी महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली आहे.
शिवाय, अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले पाणी वितरणाचे जाळेही नव्याने विस्तारण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. कमी क्षमतेची पाण्याची टाकी अन् आताच्या स्थितीमध्ये ती नादुरुस्त असल्याने नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी आपल्या रोजगारावर जाणेही दुरापास्त झालेले आहे. परिणामी, संतप्त झालेल्या सावरकरनगर, करवालनगर आणि लोकमान्यनगर या भागातील महिला आपले म्हणणे मांडण्यासाठी ‘हंडा मोर्चा’ घेऊन ठामपा मुख्यालयासमोर दाखल झाल्या. या मोर्चात माजी नगरसेवक हणमंत जगदाळेदेखील सहभागी झाले होते.
लोकमान्यनगर बस डेपोपासून रणरणत्या उन्हात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठामपा मुख्यालय गाठले. मात्र सुरुवातीस अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण ठामपाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले. अखेर, ठामपाच्या पाणीखात्याचे कार्यकारी अभियंते ढोले यांनी पालिका प्रवेशद्वारावर येऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली.
पाणी खात्याचे कार्यकारी अभियंते ढोले यांनी पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करण्यासाठी दीड महिन्यांचा अवधी लागेल, असे आश्वासन दिले आहे. मात्र इतर मागण्यांसाठी वेळ लागणार आहे. त्यास आम्ही सहमती दिली आहे. मात्र, दीड महिन्यानंतर जर हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू अन् त्याची जबाबदारी सर्वस्वी ठामपा प्रशासनाची असेल.
– अमित सरैया, माजी नगरसेवक