
मुंबई (प्रतिनिधी) : देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट अलीकडेच संपली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या एक हजारांच्या आसपास आढळत असून सर्वच राज्यांमधील कोरोना निर्बंध हटवले गेले आहेत. कोरोना नावाची महामारी संपली, अशी आशा वाटत असताना कोरोना हा संपलेला नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘कोरोना व्हायरस संपलेला नाही आणि तो पुन्हा कधीही वाढू शकतो. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, दुर्लक्ष करू नका’, असे ते म्हणाले.
‘बहुरूपिया कोरोना कधी कोणत्या रूपात परत येईल हे कोणालाच माहीत नाही. देशातील लोकांच्या पाठिंब्यामुळे या कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे जवळपास १८५ कोटी डोस देणे शक्य झाले आहे’, असे मोदी म्हणाले. ते पाटीदार समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या माँ उमियाच्या मंदिराच्या १४ व्या स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वंथली येथे माँ उमिया धामच्या कार्यक्रमाला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. ‘कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे असे नाही. आता जरी तो नसला तरी तो पुन्हा कधी येईल हे आम्हाला माहीत नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.