Friday, July 11, 2025

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर ठाणे मनपाची धडक कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) : रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि नो पार्किंगमध्ये अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील बेवारस वाहनांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग, नौपाडा-कोपरी व वागळे प्रभाग समिती आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बेवारस, नादुरूस्त व अपघातग्रस्त वाहनांवर ही धडक कारवाई करण्यात आली.


शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत वाहने लावली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. या कोंडीमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नौपाडा-कोपरी व वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने अनधिकृतपणे उभी होती. सदरच्या जुन्या, नादुरूस्त-भंगार वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत होता तसेच सकाळी व सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सदरच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते.


त्यास अनुसरून अनधिकृतपणे उभ्या असलेल्या एकूण ९ दोन चाकी, ३ चार चाकी व ८ तीन चाकी भंगार वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी वाहतुक विभागाचे पोलिस व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने केली. यापुढे रस्त्यांवरील जुन्या, नादुरूस्त, भंगार वाहनांवर तसेच नो पार्किंगमध्ये अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई करणार असल्याचेही अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >