
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदी सांघिक खेळ असो किंवा बॅटमिंटन, टेनिस, स्क्वॉश आदी क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा निळाच असतो. हॉकी व फुटबॉलमध्ये होम-अवे या नियमांमुळे पांढऱ्या रंगाची जर्सी घातली जाते; परंतु त्यांच्या मुख्य जर्सीचा रंग हा निळाच राहिलेला आहे.
जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय संघ केवळ निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानावर उतरतो. भारतीय संघाच्या जर्सीसाठी याच रंगाची निवड का करण्यात आली? केशरी, हिरवा किंवा पांढरा हे तिरंग्यातील रंगांपैकी एकाची निवड का केली गेली नाही, याची उत्तरे जाणून घेणार आहोत. सुरुवातीला क्रिकेट असो किंवा अन्य खेळ यांची जर्सी ही पांढऱ्या रंगाचीच होती. पण टीव्ही चॅनेल्स सुरू झाले आणि ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना जाऊन क्षणचित्र रंगीत स्वरूपात दिसू लागले. त्यानंतर खेळांमध्येही बदल होत गेले.
केशरी रंग हा शौर्याचा प्रतीक आणि हिरवा रंग आनंदाचे प्रतीक, तर पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. तिरंग्यातील कोणताही रंगाचा जर्सीसाठी विचार केला असता तर त्याचा संबंध धर्माशी जोडला गेला असता आणि त्यावरून राजकारण तापले असते. केशरी हा हिंदू, जैन व बौद्धांचा किंवा काही राजकीय पक्षोचा, हिरवा हा मुस्लीम समुदायाचा असा तेव्हा विचार केला गेला असावा. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याची प्रचिती देणारा रंगच जर्सीसाठी हवा होता.