मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील साखळी फेरीत गुरुवारी (७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फॉर्मात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला विजयी हॅट्रिक नोंदवण्याची संधी आहे.
लखनऊची सुरुवात अपयशी झाली. गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पाहिलेल्या सुपर जायंट्सनी त्यानंतर गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि हैदराबाद सनरायझर्सला हरवत सलग दोन विजय नोंदवलेत. यंदाच्या हंगामात लखनऊसह गुजरात टायटन्स, बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स आणि राजस्थान रॉयल्सनी डबल धडाका केला आहे. त्यात राजस्थानची विजयी घोडदौड संपुष्टात आली. मात्र लखनऊसह बंगळूरु आणि गुजरातला विजयी हॅटट्रिक नोंदवायला चान्स आहे. दुसरीकडे, दिल्लीने माजी विजेता मुंबई इंडियन्सला हरवून आश्वासक सुरुवात केली. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
गुजरातविरुद्धच्या निसटत्या पराभवातून बोध घेत कर्णधार लोकेश राहुल आणि सहकाऱ्यांनी खेळ उंचावला. त्यात कॅप्टन राहुलचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या लोकेशने पुढील २ सामन्यांत अनुक्रमे ४० आणि ६८ धावा केल्या. मागील लढतीत हैदराबादविरुद्ध त्याने कमालीचा संयम दाखवला. मात्र, हाफसेंच्युरीनंतर छान फटकेबाजी केली. बॅटिंग उंचावण्यात कर्णधारानंतर दीपक हुडासह आयुष बदोनी, इविन लेविस आणि क्विंटन डी कॉकचा वाटा आहे. मात्र, लोकेश आणि हुडाप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू डी कॉक यांना सातत्य राखता आलेले नाही. मात्र त्यांच्यासह अष्टपैलू कृणाल पंड्या, आघाडी फळीतील मनीष पांडे, अष्टपैलू जेसन होल्डर यांनी खेळ उंचावला, तर लखनऊची फलंदाजी आणखी मजबूत होईल. सुपरजायंट्सच्या अावेश खानचा फॉर्म उल्लेखनीय आहे. त्याने तीन सामन्यांत ७ विकेट घेतल्यात. मात्र बॉलिंग आणखी मजबूत होण्यासाठी अँड्र्यू टाय, दुशमंत चमीरा, जेसन होल्डर, रवी बिश्नोई, कृणाल पंड्याची अावेशला सक्षम साथ आवश्यक आहे.
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने पहिल्याच सामन्यात आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला अस्मान दाखवले. मात्र कामगिरीत सातत्य राखता न आल्याने गुजरातविरुद्ध मात खावी लागली. मात्र, त्यांना लखनऊप्रमाणे पराभवातून बोध घेत खेळ उंचावण्याची गरज आहे. दिल्लीने कामगिरी उंचावली तर गुरुवारी चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. त्यासाठी कॅपिटल्सना सर्व आघाड्यांवर खेळ उंचवावा लागेल.
दोन सामन्यांनतर दिल्लीच्या कुठल्याही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. सर्वाधिक नाबाद ४८ धावा ललित यादवच्या आहेत. त्याच्यासह कर्णधार रिषभ पंत, पृथ्वी शॉ या आघाडीच्या फळीसह अष्टपैलू अक्षर पटेलला चाळीशी पार करता आलेली आहे. मनदीप सिंगसह रोवमन पॉवेल यांना अद्याप सूर गवसलेला नाही. लेगस्पिनर कुलदीप यादवसह मुस्तफिझुर रहमान, खलील अहमदने थोडी फार प्रभावी गोलंदाजी केली तरी अनुभवी स्पिनर अक्षर पटेल, मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर यांना दोन सामन्यांत एकही विकेट मिळवता आलेली नाही. त्यामुळे बॉलर्सच्या कामगिरीवरही दिल्लीचे यशापयश अवलंबून आहे.
वेळ : रा. ७.३० वा.
ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई