नालासोपारा (वार्ताहर) : सध्या इंधनाच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाचा वाढता धोका पाहता वसईतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी कार बनवली आहे. विशेष म्हणजे ही कार पूर्णतः विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात बनवली आहे. यासाठी ३ वर्षे लागले असून ४ लाख रुपये खर्च आला आहे.
वसईतील वर्तक महाविद्यालयातील अभियांत्रिकी शाखेसह मॅकेनिकल, आयटी, संगणक विभागातील ४० मुलांनी ही कार बनवली आहे. त्यांनी शैक्षणिक प्रकल्प म्हणून २०१७ पासून ही कार बनवण्यास सुरुवात केली होती. आधी मुलांनी विद्युतकार बनवली होती. त्यात त्यांनी अधिक संशोधन करून आता त्यांनी याला सौर पॅनलचा उपयोग करून आता ही कार त्यांनी दोन्ही पद्धतीने बनवली आहे. सध्या ही तीन चाकांची कार असून ती ताशी ६५ किमी वेगाने धावू शकते. त्याचबरोबर एकदा चार्ज केल्यावर किमान १२५ किमी प्रवास करता येत आहे. सध्या ही कार रस्त्यावर आली नसली तरी भविष्यातील इंधन पर्याय म्हणून याकडे पहिले जात आहे.
या विद्यार्थ्याचे मार्गदर्शक प्रा. चौधरी यांनी माहिती दिली की, अद्याप या कारची स्वामित्व नोंदणी केली नाही, पण लवकरच केली जाणार आहे. तसेच या कारची विशेषता म्हणजे ही विनाचालक चालावता येणार आहे. त्याला एक ठरावीक मार्ग दिला असता कार कोणतीही मानवी सहाय्यता न घेता आपल्याला इच्छितस्थळी घेऊन जाईल. विद्यार्थ्यांनी या कारवर विशेष मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर लवकरच चार चाकी आणि दुचाकीसुद्धा बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कारची चर्चा सध्या संपूर्ण वसईत सुरू आहे.