मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे नवनवे मुहूर्त जाहीर करणाऱ्या भाजपकडून आता आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे १४ खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचे, असा दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे.
शिवसेनेचे हे खासदार पक्षावर असंतुष्ट आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या १४ खासदारांची तळमळ शांत करता आलेली नाही. मात्र, या असंतुष्ट खासदारांची जळजळ शांत करण्याचं चूर्ण भाजपकडे आहेत, असे सूचक वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रसाद लाड यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रसाद लाड यांनी तुर्तास शिवसेनेच्या या १४ नाराज खासदारांची नावे उघड करण्यास नकार दिला आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ही नावं जाहीर करू, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. याशिवाय, राज्यातील शिवसेनेचे २४ ते २५ आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे लाड यांनी म्हटले आहे. सध्या लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार आहेत. यापैकी १४ आमदार भाजपच्या संपर्कात असल्यास ही शिवसेनेसाठी गंभीर समस्या ठरू शकते. त्यामुळे आता शिवसेनेतील हे १४ नाराज आमदार कोण, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर आता शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.
शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज : चंद्रशेखर बावनकुळे
काही दिवसांपूर्वी भाजपकडून शिवसेना आणि काँग्रेसमधील आमदार नाराज असल्याचा दावा करण्यात आला होता. शिवसेनेतील ९० टक्के आमदार नाराज आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची नाराजी लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने १०० प्लस आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला किती निधी मिळाला बघा, असे सांगतील. या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण करून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरु असल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.