कोल्हापूर (प्रतिनिधी) : गृहराज्यमंत्र्यांची दहशत बलात्काऱ्यांवर, गुंडावर हवी, विरोधकांवर नाही, असे म्हणत चित्रा वाघ यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला आहे. रविवारी ३ एप्रिल रोजी कोल्हापूर येथील सभेवर दगडफेक झाल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. यावेळी गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, “मी इतक्या वाईट पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले कधीही पाहिलेले नव्हते. रविवारी ३ एप्रिल भाजपचे आमचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम यांची मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी प्रचारसभा चालू होती. तेथे माझे भाषण चालू असताना काही अज्ञातांकडून दगड मारण्यात आले. या संदर्भातील तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत. कुठल्याही निवडणुकीत अशा पद्धतीच्या घटना घडणे निंदनीय आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना कोल्हापुरात जो प्रकार घडला तो पहिल्यांदाच घडला. ज्यांनी हे काम केले त्याचा निषेध करत असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.