मुंबई : कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्युची बातमी पसरताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीने या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर ट्वीट करत म्हणाले की, “मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?”
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.
साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? pic.twitter.com/vUWNGgVrqw— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 2, 2022
याआधी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करताच काही वेळाने याप्रकरणातील तक्रारदार मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीत पोलिसांना सापडला होता. यावरुन भातखळकरांनी पंच प्रभाकर साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना, असा टोला लगावला आहे.