जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर ‘लाच’ दिल्याच्या आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनानं सीबीआयकडं या प्रकरणाच्या चौकशीची शिफारस केली आहे.
सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना युनियन आणि बड्या औद्योगिक घराण्यांच्या फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात 300 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार देत सौदे रद्द केले होते, असं मलिकांनी नमूद केलंय.
मलिकांनी सांगितलं होतं की, मी जम्मू-काश्मीरचा राज्यपाल झालो, तेव्हा माझ्याकडं दोन फाईल्स आल्या होत्या. एका फाईलमध्ये अंबानींचा समावेश होता, तर दुसरी आरएसएसचा वरिष्ठ अधिकारी आणि मेहबुबा सरकारमधील एका मंत्र्याशी संबंधित होती. हे नेते स्वत:ला पंतप्रधान मोदींचे जवळचे म्हणवायचे. ज्या विभागांच्या या फायली होत्या, त्यांच्या सचिवांनी या फायलींमध्ये गडबड असल्याचं सांगितलं होतं आणि सचिवांनीही त्यांना या दोन्ही फायलींमध्ये 150-150 कोटी रुपये मिळू शकतात, अशी ऑफर दिली होती; पण मी या दोन फायलींशी संबंधित करार रद्द केला, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत.