मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर १० मार्च पर्यंत कामावर राहण्याचं अल्टिमेटम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र अजूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत.
एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा अल्टिमेटम राज्याचे अनिल परब यांनी दिला होता. या मुदतीपर्यंत हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येईल, अशी ग्वाही परब यांनी दिली होती. मात्र, १० मार्चपर्यंत रुजू झाले नाहीत तर नोकरी कायमची गमवावी लागेल, असा इशाराही दिला होता. मात्र त्यांच्या याच अल्टीमेटमनंतरही कर्मचारी संपावर कायम असल्याचे समोर आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान अनेक संघटनेच्या लोकांनी माघार घेतली. त्यानंतर सरकारकडून पगारवाढीची घोषणा झाली, त्यानंतर आता सातवा वेतन आयोग देण्यात येईल, अशी चर्चा सुरु आहे. मात्र असे असले तरीही शासनात विलीनीकरण ही कर्मचाऱ्यांची एकच मागणी असल्याचे अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.