मुंबई : अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप उद्या मुंबईत विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती भाजपाचे आशिष शेलार यांनी दिली. पोलिसांनी या मोर्चाला परवागनी दिलेली नाही. मात्र तरीही भाजप मोर्चा काढणारच, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विषयांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपावरून भाजपने महाविकास आघाडीला धारेवर धरणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आजही भाजपाकडून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर बसून ही कारवाई पुर्ण व्हावी यासाठी मागणी केली.
यावेळी शेलारांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, परवानगी नसली तरी आम्ही विनापरवाना मोर्चा काढणार आहे. न्यायालयही नवाब मलिक यांच्या केसमध्ये सक्षमपणे काम करत आहे. मात्र केवळ लाचारीसाठी सरकारचे मंत्री हा राजीनामा घेत नाहीयेत. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यात सामील असल्याचे दु:ख होत आहे. आजपासून पालिकेवर आयुक्त राज सुरू झाले आहे. भ्रष्टाचाराचे राज्य बाजूला जाईल अशी अपेक्षा आहे. एक कोटी ४० लाख मुंबईकरांवर दोन लाख कोटी रुपये खर्च केले असे शिवसेना सांगत आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या बेनामी संपत्तीत वाढ झाली आहे. त्यांनी जाता जाता देखील डल्ला मारला आहे, असा टोला त्यांनी लगावला.