योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार
सुधीर गजानन जोशी! शिवसेनेची एक बुलंद तोफ १७ फेब्रुवारी २०२२ रोजी खऱ्या अर्थाने शांत झाली. गेल्या काही वर्षांपासून सुधीरभाऊ हे केवळ आपले शारीरिक अस्तित्व टिकवून होते. ज्यावेळी त्यांचा दुर्दैवी अपघात झाला, त्यानंतर ते फक्त शरीराने वावरत होते. तमाम शिवसैनिक असो, कामगार असो की बँक कर्मचारी, सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिला होता. अर्थात, जुन्या शिवसैनिकाला, बँक कर्मचाऱ्याला, लोकाधिकारचा कार्यकर्ता, पदाधिकारी याला सुधीरभाऊंची शिदोरी जी लाभली होती, त्या शिदोरीवर तो आजवर मार्गक्रमण करीत आला. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना जन्माला घातली. त्यानंतर हटाव लुंगी, बजाव पुंगीचा नारा देत एका बाजूला दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेना, तर सुधीरभाऊ जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ यांची बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला ललामभूत अशी देणगी दिली. एकापेक्षा एक सरस कार्यकर्ते सुधीरभाऊंनी घडविले. मराठी माणूस ताठमानेने आस्थापनांमध्ये आपला पाय रोवून उभा राहिला. एका बाजूला स्थानीय लोकाधिकारचे काम सुरू असताना विधान परिषद आणि विधानसभा ही कायदेमंडळेसुद्धा आपण अभ्यासिली पाहिजेत म्हणून सुधीरभाऊंनी मुंबईच्या महापौर पदानंतर आपला मोर्चा विधिमंडळाकडे वळविला. त्यांनी विधिमंडळात आपला जबरदस्त ठसा उमटवला. आपल्या मिश्कील भाषण करण्याच्या स्वभाव/पद्धतीमुळे सुधीरभाऊ हे समोरच्या माणसाच्या अंगावर एक ओरखडाही येऊ न देता घायाळ करीत असत.
आमच्या साप्ताहिक ‘आहुति’च्या वर्धापन दिन विशेषांकाच्या प्रकाशन समारंभासाठी विरोधी पक्षनेते सुधीरभाऊ जोशी हे अंबरनाथ येथे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे मित्रवर्य नारायणराव हरळीकरसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून भाऊंच्या बरोबर होते आणि भाऊंचे ‘राम लक्ष्मण’ समान दोन सचिव दिवाकर बोरकर आणि प्रवीण पंडितसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून अंबरनाथ वगळण्यासाठी आम्ही नऊ वर्षे लढा दिला आणि त्या महानगरपालिकेतून अंबरनाथ स्वतंत्र करण्यात आम्हाला यश मिळाले; परंतु मुंबईतील राणीच्या गळ्यातल्या हार असलेल्या क्वीन्स नेकलेसप्रमाणे अंबरनाथ येथे प्रभाकर नलावडे नगराध्यक्ष असताना ‘शिवदर्शन’ बंगला बांधण्यात आला होता. महानगरपालिकेतून अंबरनाथ जरी वेगळे केले असले तरी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय काढताना, अंबरनाथची मालमत्ता अंबरनाथ नगरपालिकेच्या ताब्यात देताना मखलाशी करीत ‘शिवदर्शन’ बंगला कल्याण महानगरपालिकेच्याच ताब्यात ठेवला. मी हा मुद्दा विरोधी पक्षनेते सुधीरभाऊ जोशी यांच्यासमोर ‘आहुति’च्या कार्यक्रमात उपस्थित केला. तेव्हा सुधीरभाऊ शांत आणि मिश्कीलपणे म्हणाले, अहो त्रिवेदी, तुम्ही कशाला वाईट वाटून घेता की, कल्याणचे आयुक्त अंबरनाथमध्ये ‘शिवदर्शन’ बंगल्यात राहून कल्याणचा कारभार हाकताहेत. हे कां? अहो, दाऊद नाही का दुबईमध्ये राहून मुंबईत कारभार करतोय? मिश्कील पण वेगळाच संदेश सुधीरभाऊंनी आपल्या बोलण्यातून दिला होता. गृहिणी आपल्या घरात साखर, मीठ यांच्या डब्यांवर पट्टी लावून ठेवायच्या. पण मुंगीला थोडंच वाचता येतं की, मीठ कुठे लिहिलंय आणि साखर कोणत्या बरणीत आहे. ती वाचून थोडीच जाते. तिला बरोबर कळतं की, कोणता जिन्नस कोणत्या बरणीत आहे. असे मिश्कीलपणे भाऊ बोलत असत. १९९० साली शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता थोडक्यात हुकली, ती १९९५ साली मिळाली. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले आणि सुधीरभाऊ जोशी यांच्याकडे महसूल खाते आले. एकदा त्यांच्याकडे एका प्रथितयश इंग्रजी वर्तमानपत्राचे मालक/भागीदार आले होते. योगायोगाने मी त्यांच्या दालनात बाजूच्या सोफ्यावर बसलो होतो. त्या मालक/पार्टनर यांनी आपल्या सर्वाधिक खपाच्या इंग्रजी वर्तमानपत्रासाठी जागेची मागणी केली होती. भाऊंचा कडवट शिवसैनिक जागृत होताच. ती नस्ती (फाइल) डाव्या हाताने बाजूला करीत मिश्कीलपणे सवाल केला. अहो, पस्तीस वर्षे पूर्ण झाली शिवसेनेला. आज शिवसेना सत्तेत आहे. एवढे असूनही शिवसेनेला तुमच्या वर्तमानपत्रात नऊ नंबरचे पान? आणि तिथे सुद्धा सिंगल कॉलम बातमी? पहिले पान आमच्या नशिबी नाही? काय बोलणार? ते मालक/पार्टनर माना खाली घालून बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जे नियमानुसार असेल ते होईल. पण माझा मुद्दा लक्षात आला काय? सुधीरभाऊ जोशी यांच्या बिनतोड सवालासमोर ते निरुत्तर झाले होते. सुधीर जोशी यांची सांपत्तिक स्थिती मुळातच बऱ्यापैकी होती. त्यांच्या वडिलांचे नाव गजानन आणि त्यांच्या मामांच्या वडिलांचे नावही गजानन. मनोहर गजानन जोशी. मनोहर जोशी हे रायगड जिल्ह्यातील नांदवी येथून मुंबईत आले होते. ते गरिबीतून वर आलेले. मामा-भाचे दोघे समवयस्क. मनोहर जोशी यांची सख्खी मोठी बहीण ही सुधीरभाऊंची आई. ते सुरुवातीपासून दादर येथे राहत. मनोहर जोशी ग्रामीण भागातून दादर येथे आले. सुधीरभाऊंनी मनोहर पंतांना मोटार चालवायला शिकविली. मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर या त्रिमूर्तींनी राजकीय क्षेत्रात अतिशय धमाल उडवून दिली असल्याच्या कहाण्या लोक चवीने सांगतात. अनेक आमदारांना या त्रिमूर्तींनी राजभवनावर ‘तुमची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे, उद्या सकाळी राजभवनावर शपथविधीला पोहोचा’, असे निरोप दिले आहेत. मनोहर आणि सुधीर हे दोन जोशी समोर दिसले की, समोरून येणारे सहज बोलायचे, काय? आज दोन्ही जोशी एकत्र? तेव्हा नवलकर मिश्कीलपणे म्हणायचे की, दोन जोशी आणि एक रामोशी पण आहे. आणि मग हास्याचा धबधबा उसळायचा. तिघेही मिश्कील. आज सुधीरभाऊंच्या जाण्याने या त्रिमूर्तीमधील डॉ. मनोहर जोशी हे एकाकी पडले. अर्थात मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर या तिघांनी मुंबई महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी फार मोठे योगदान दिले आहे.
सुधीरभाऊंनी हिंदुत्वाच्या व्याख्येची माहिती बाळासाहेबांना दिली आणि त्यांनी भरभरून रेनॉल्डची पेनं माझ्या हातात दिली! १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली होती. दादर मतदारसंघात डॉ. मनोहर जोशी आणि काँग्रेसचे भाऊराव पाटील यांच्या मध्ये ‘सामना’ झाला. शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी विजयी झाले. तेव्हा भाऊराव पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गिरगाव चौपाटीवर झालेल्या विराट जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ ही व्याख्या मांडली होती. मनोहर जोशी यांच्या निवडणूक खटल्यात मी बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या न्यायमूर्ती एस. एन. वरियावा यांच्या समोर माझ्या साक्षीत नमूद केली. ही बाब शिवसेना नेते सुधीरभाऊ जोशी यांना माहीत होते. एकदा मी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेलो असताना योगायोगाने तिथे उपस्थित असलेल्या सुधीरभाऊंनी मी बाळासाहेबांची हिंदुत्वाची व्याख्या माझ्या साक्षीत न्यायालयात पुराव्यानिशी सादर केल्याचे आवर्जून सांगितले. तेव्हा बाळासाहेबांसमोर असलेल्या मेजाजवळ (टी पॉय) रेनॉल्डची भरपूर पेनं होती. बाळासाहेबांनी आपल्या हातात ती सर्व पेनं घेऊन ती मला दिली आणि माझ्या पाठीवर शाबासकी दिली. सुधीरभाऊंमुळे मला ही अनमोल भेट लाभली, हा एकप्रकारे मला मिळालेला आशीर्वादच होता.
शिवसेनेच्या पहिल्या फळीतील एक बिनीचा शिलेदार सुधीरभाऊ जोशी यांच्या निधनाने आपण गमावला आहे. त्यांनी सुधीरभाऊंनी विधान परिषदेत केलेल्या भाषणांचे निलेश मदाने यांच्या अधिपत्याखाली असलेल्या वि. स. पागे संशोधन केंद्रामार्फत उत्तम ग्रंथ निर्माण केले, तर येणाऱ्या नवीन पिढीला संसदपटू सुधीर जोशी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा पर्यायाने सुधीरभाऊंच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा परिचय निश्चित होईल. सुधीरभाऊंच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा!