नवी दिल्ली : शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन-स्मरण केले तसेच आदरांजली अर्पण केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
किसान ड्रोन शेतकऱ्यांना सक्षम करेल
देशभरात १०० ठिकाणी किसान ड्रोन उड्डाण उपक्रमावार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला. किसान ड्रोन देशभरात १०० ठिकाणी कार्यरत झालेली पाहून मला आनंद झाला आहे. हा @garuda_india स्टार्ट-अपचा प्रशंसनीय उपक्रम आहे. असे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करेल आणि शेती अधिक लाभदायक होईल, असे मोदी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा सातव्या वर्षात प्रवेश
प्रधानमंत्री पीक विमा योजनेने (पीएएफबीवाय) आगामी खरीप २०२२ हंगामासह अंमलबजावणीच्या सातव्या वर्षात यशस्वीपणे प्रवेश केला आहे. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील सीहोर येथे योजनेचा प्रारंभ केल्याच्या घोषणेपासून तिच्या अंमलबजावणीची सहा वर्षे पूर्ण होत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान/हानी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट भारत सरकारच्या या पथदर्शी योजनेचे आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना हे उद्दिष्ट साध्य करीत आहे. या योजनेअंतर्गत ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १,०७,०५९ कोटी रुपयांहून अधिकचे दावे निकाली काढण्यात आले. तसेच ३६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या पीकाचा विमा उतरवण्यात आला आहे. ही योजना राज्य/जिल्हा स्तरावरील तक्रार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी तळागाळापर्यंत मांडण्याची सुविधा देते, यामध्ये वर्षातून दोनदा साजरा होणारा पीक विमा सप्ताह,पीएएफबीवाय पाठशाळा, समाजमाध्यम अभियान, टोल-फ्री मदतक्रमांक आणि ईमेलद्वारे संवाद यांसारख्या ‘आयईसी’ म्हणजेच माहिती, शिक्षण आणि संवाद या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारणे आणि त्यांचे निराकरण करणे देखील समाविष्ट आहे.