
मुख्यमंत्री ठाकरेंसमोर पंतप्रधान मोदींचा घणाघात
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ठाणे-दिवाला जोडणाऱ्या रेल्वेच्या नव्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कार्यक्रमात संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. 'सर्व प्रथम भारताचा गौरव, भारताची ओळख, संस्कृतिचे रक्षक आणि देशाचे महान महानायक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आदरपूर्व नमन करतो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरवात केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एकदिवस आधी ठाणे-दिवा दरम्यान बांधण्यात आलेल्या ५ व्या आणि ६ व्या नव्या रेल्वे मार्गिकांचे लोकार्पण होत आहे. या निमित्ताने प्रत्येक मुंबईकराचे अभिनंदन करतो. नव्या रेल्वे मार्गांमुळे मुंबईकरांच्या जीवना मोठ बदल घडवेल आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ठाणे-दिवा दरम्यानच्या ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गिकांच्या योजनेचे २००८ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात युपीएत भूमिपूजन झाले होते. ही योजना २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने ही योजना २०१४ पर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे रखडत गेली. पण यानंतर आम्ही या योजनेवर वेगाने काम करण्यास सुरवात केली. योजनेतील अडथळे दूर केले, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी तत्कालीन काँग्रेस प्रणित यूपीए सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
मुंबईने स्वतंत्र भारताच्या विकासात आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे. आता स्वावलंबी भारताच्या विकासासाठी मुंबईचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले पाहिजे. म्हणूनच मुंबईत २१ व्या शतकातील पायाभूत सुविधांच्या विकासावर आमचे विशेष लक्ष आहे, असे ते पुढे म्हणाले.
रेल्वे कनेक्टिव्हीसाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली जात आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला आधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञानाने सक्षम केले जात आहे. आता जी मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता आहे, त्यात आणखी जवळपास ४०० किलोमीटरची अतिरिक्त वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, ते म्हणाले. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या आधुनिक सिग्नल प्रणालीसह १९ रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचीही केंद्राची योजना असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.