ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील ३०० हून अधिक देशी कोंबड्या आणि बदके गेल्या काही दिवसांत मृत पावली आहेत. या कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब तपासणी अहवालात निष्पन्न झाली आहे. यामुळे सर्तक झालेल्या पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटर परिघातील किमान २५ हजारांहून अधिक पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्यांतही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे का, याचा आढावा घेण्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले आहे. तर, बाधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधितक्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शहापूरमधील वेहळोली गावात १०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. भाऊसाहेब डांगळे यांनी दुजोरा दिला आहे. मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामधून कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
वेहळोली गावातील १०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून कुक्कुटपालन केंद्राच्या १ किलोमीटर परिघातील कोंबड्यांची कत्तल करण्यात येणार आहे. या कोंबड्यांची संख्या जवळपास २५ हजारांच्या घरात आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन खात्याने कोंबड्या मारण्याच्या सूचना दिल्याचे नार्वेकरांनी सांगितले.
बर्ड फ्लू पसरू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब डांगळेंनी सांगितले. केंद्रीय मत्स्य पालन आणि पशुपालन मंत्रालयाला याबद्दलची माहिती देण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले.
शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूची साथ पसरली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गटाने कोंबड्यांचा किंवा इतर पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे आढळून आले तर नागरिकांनी त्याची माहिती तात्काळ पशू विभागाला देणे गरजेचे आहे. – डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद