नवी दिल्ली : करोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यानंतर सर्व राज्यांनीही करोना निर्बंध शिथिल करण्यास सुरवात केली आहे. आता याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
राज्यांनी करोनाच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यास ते सुरवात शकतात. कारण आता देशातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहेत, असे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे. मंत्रालयाच्या या पत्रात करोनाची आकडेवारीही देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३०,६१५ रुग्ण समोर आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हा आकडा ५० हजारांच्या पुढे होता. त्याच वेळी पॉझिटिव्हिटी दर देखील १५ फेब्रुवारीला ३.६३ टक्क्यांपर्यंत खाली आला, असे केंद्राने पत्रात म्हटले आहे.
पण करोनाच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवा. दररोज आढळून येणारे नवीन रुग्ण आणि संसर्गाचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, लसीकरण आणि करोनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत, असेही केंद्र सरकारने पत्रात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ६१५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या मंगळवारच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. देशात गेल्या २४ तासांत ८२ हजार जण करोनातून बरे झाले आहे. तर ५१४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात अजूनही ३ लाख ७० हजार २४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील करोना रुग्णांचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा २.४५ टक्के इतका आहे.