नवी दिल्ली : भारताचा आर्थिक विकास आणि भारताने विकसित केलेली लस यामुळे जगात एक विश्वास निर्माण करते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चांचे मुद्दे आणि मोकळ्या मनाने केलेली चर्चा जागतिक संधी निर्माण करू शकते. यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि सदस्यांनी खुल्या मनाने उत्तम चर्चा करून देशाच्या विकासात आणि प्रगतीला गती देण्यास मदत करतील, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींनी संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात होत आहे आणि खासदारांसह आपल्या सर्वांचे स्वागत आहे, असे म्हणत पत्रकार परिषदेत संवाद साधला. सध्याची जागतिक स्थिती पाहता भारतासाठी अनेक संधी आहेत, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
सततच्या गदारोळामुळे चर्चा विस्कळी होतेय. विधानसभा निवडणुकांमुळे संसदेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. पण निवडणुका होतच राहतील. पण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण वर्षभराचं देशाच्या विकासाचं चित्र समोर मांडतं. यामुळे विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन हे अधिवेशन फलदायी होईल यासाठी सहकार्य करावं. देशाच्या आर्थिक विकासाला नवी उंची देण्यासाठी हे एक मोठी संधी आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने त्याची सुरुवात होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केले जाईल. देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र स्पष्ट करणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आर्थिक सर्वेक्षण कोरोनाच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग स्पष्ट करेल. आर्थिक सर्वेक्षण सर्वेक्षण हा चालू आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असेल आणि यामध्ये देशाचा जीडीपी नऊ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाचे आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.