
नवी दिल्ली : देशात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट दिसून आली आहे. मात्र, मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या २४ तासांत २ लाख ९ हजार ९१८ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सक्रीय रुग्णांची संख्या आजही १८ लाखांवर आहे. देशात एकूण १८ लाख ३१ हजार २६८ रुग्ण उपचार घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे मृतांच्या आकड्यात सतत वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभराची आकडेवारी पाहता, कोरोना आपल्या जुन्या रुपात येत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोना पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव करणार का, अशी शंका तज्ज्ञांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहे.
देशात रविवारी ८९३ आणि शनिवारी ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजचा आकडा हा ९५९ वर पोहचला आहे. यामुळे हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असताना मृत्यूंचा आकडा वाढू लागला आहे.
केरळमध्ये सर्वाधिक ५१,५७० रुग्ण आहेत. यानंतर कर्नाटकात २८,२६४, महाराष्ट्रात २२,४४४, तामिळनाडूमध्ये २२,२३८, आंध्र प्रदेशात १०,३१० रुग्ण सापडले आहेत. या ५ राज्यांमध्ये, देशातील एकूण रुग्णांपैकी ६४.२२ टक्के रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये २४.५७ टक्के रुग्ण सापडले आहेत.