
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी या अहंकारात शहाणपण गमावले असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
राज्य सरकारने भाजप आमदारांविरोधात केलेल्या निलंबनाच्या ठरावावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून हा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेलार यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
राज्य विधानसभेत सरकारने केलेला ठराव असंविधानिक, अवैध आणि तर्कहीन असल्याचे ताशेरेसर्वोच्च न्यायालयाने ओढले. अशा प्रकारचे ताशेरे पहिल्यांदाच राज्य सरकारवर ओढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने केलेले निलंबन हे त्यांच्या हकालपट्टीपेक्षाही भयंकर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते असे शेलार यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक असल्याचे शेलार यांनी म्हटले. सरकारला आपली चूक सुधरवण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. मात्र, ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावले असल्याची टीका शेलार यांनी केली. ठाकरे सरकारच्या अवैध ठरावामुळे विधीमंडळाच्या पारदर्शी कामकाजाला ठाकरे सरकारच्या ठरावामुळे इजा पोहचली आहे. महाराष्ट्राबद्दल देशात होणारी अवास्तव चर्चा सरकारला थांबवता आली असती. ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च पातळीवर असल्याचे शेलार यांनी म्हटले.