मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या मुंबई, ठाणे, पुणे, कोकण असा सर्वत्र थंडीचा कडाका वाढलेला दिसत आहे. तापमान कमी जास्त होत असले तरी थंडी मात्र कायम आहे असल्याने मुंबईकर पुरते गारठले आहेत. त्यात पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची जणू लाटच येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचेही हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. तर २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामानात अचानक मोठा बदल होऊन राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचे मळभ निर्माण झाले होते.
वाढलेल्या आर्द्रतेतून धुके आणि धूळ वाढवणाऱ्या वेगवान वाऱ्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती ठळकपणे जाणवली. तर सौराष्ट्राकडून धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे मुंबईतल्या अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला होता.
हवा बिघडली...
पाकिस्तानातून सौराष्ट्रामार्गे धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात घट झाल्याचे दिसले. सरासरीच्या तुलनेत तापमानात विक्रमी घट झालेली दिसली. कुलाबा येथे२४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २३.८अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६ आणि ७ अंशांची घट झाली. हे गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे.