नवी दिल्ली : केंद्राने आपला निर्णय बदलला असून आता राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार होता. परंतु सुरक्षेच्या कारणावरून केंद्र सरकारने या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली होती.
महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदाच्या देखाव्यातून राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवले जाणार आहे. जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढळणाऱ्या विविध सजीव प्रजातींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच राजपथावरील संचलनाचे आकर्षण राहिला आहे. आता महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा सर्वोत्तम ठरणार का, हे देखील पाहावे लागेल.
दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या रथालाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच त्यांना पत्रही पाठवले होते. ममता यांनी आपल्या पत्रात, केंद्र सरकारच्या अशा वागण्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना देशातील स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर आधारित चित्ररथाला जागा न मिळणे हे संतापजनक असल्याचं म्हटंल होतं.
२६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब पटकवला आहे. २०१५मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता.