
मुंबई : राज्यातील अनेक गावात ४जीचे मोबाईल पोहचले असले तरी अनेक गावांमध्ये नेटवर्कची सर्वात मोठी समस्या आजही जाणवते. या नेटवर्कच्या समस्येचा सर्वाधिक फटका हा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला बसत आहे.
नेमणूक झालेल्या गावात रेंज नसल्यामुळे अनेक ग्रामसेवकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आराखडे भरण्याचे काम करावे लागत आहेत. येत्या ३० जानेवारीपर्यंत विकास आराखडे भरून देण्याची मुदत आहे. या मुदतीतच काम पूर्ण करावे लागणार आहे.
केंद्र व राज्य सरकार तसेच ग्रामपंचायतींना स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतून गावात काय सुविधा व विकास केला जाणार आहे, याबाबतचा विकास आराखडा तयार करायच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. याबरोबरच कोणत्या योजनांवर किती खर्च करावा या सूचनाही देण्यात आल्या आहेत. योजना राबवत असताना प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन यावर प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. गतवर्षापासून ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे.