मुंबई : शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि राष्ट्रवादीचे बळ वाढवायचे अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती, असा धक्कादायक आरोप दापोली मंडणगड खेडचे आमदार आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निवडून न येता अपक्ष उभे राहिलेले योगेश कदम गटाचे आठ उमेदवार निवडून आले. या निकालामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुलाने नाराजी जाहीर करत मनातील सल बोलून दाखवली आणि आपल्याच पक्षाला आहेर दिला.
“दापोलीच्या नगरपंचायतीत पाच वर्ष शिवसेनेची सत्ता होती. ती आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे गेली आहे. फायदा कोणाचा तर राष्ट्रवादीचा झाला आहे. शिवसेनेचा फायदा झालेला नाही. जे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत त्या सहापैकी चार राष्ट्रवादीचे लोक आहेत. ते शिवसैनिक नाहीत. म्हणजे एबी फॉर्म भरण्याच्या दोन मिनिटं आधी त्यांच्या गळ्यात पट्टे घालण्यात आले. हे निर्णय शिवसैनिकांनी मान्य केले नाहीत,” असे योगेश कदम यांनी सांगितले.