मुंबई : “भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं” असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. तसेच, त्यांनी यावेळी “अजुनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे.” असे म्हणत महाविकास आघाडीला आव्हानही दिले.
राज्यात ओबीसी आरक्षाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल लागत आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी आज झाली.
या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपाच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “आज १०६ नगरपंचायतींचे निकाल लागत आहेत, त्यातील सात नगरपंचायतींचे निकाल उद्या लागतील. म्हणजे जवळपास ९९ नगरपंचायतींचे निकाल पूर्ण लागले आहेत, असे म्हणायला आता हरकत नाही. पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे. सदस्य संख्येत देखील भाजपा क्रमांक एकवर. नगरपंचायती पूर्ण जिंकणं आणि भाजपाच्या पाठिंब्याने जिंकणे यात देखील भाजपा क्रमांक एकवर हे सिद्ध झालं आणि वारंवार आम्ही ते म्हणत आहोत, की महाराष्ट्रात वेगवेगळे लढा आणि मग कोणाची ताकद जास्त आहे ते पाहू.”
तसेच, “विचाराने, आचाराने एक नसताना देखील युती करून भाजपाशी लढत देण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्या एकत्र लढण्याला देखील नजीकच्या काळात आम्ही पुरून उरू. पण एकएकटे लढण्यात आम्ही हे सिद्ध केलं आहे, सहा जिल्हापरिषदांच्या पोटनिवडणुकांमध्येही सिद्ध केलं, ग्रामपंचायत निवडणुकीतही सिद्ध केलं, विधानपरिषद निवडणुकीतही सिद्ध केलं, पंढरपुरलाही सिद्ध केलं आणि आज नगरपंचायती व दोन जिल्हापरिषद निवडणुकातही सिद्ध केलं आहे की, भाजपाच महाराष्ट्रामधील क्रमांक एकचा प्रश्न आहे.”