Monday, May 12, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

औरंगाबाद : आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातूनही सावरत शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, कांदे आदीसह भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. मात्र आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे.


राज्यात पावसासाठी पोषक हवामान असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादच्या काही भागात तुरळक पाऊस पडल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरण असून, काही भागात सूर्यदर्शन सुद्धा झाले नाही. तर पैठण रोडवरील गेवराई परिसरात सकाळी दहा वाजेच्या दरम्यान तुरळक पावसाचे थेंब पडले आहेत. तर परभणी जिल्ह्यात काल रात्री अर्धा तास पाऊस झाला असून, सकाळपासून गारवा जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधून मधून रिमझिम अगदी हलक्या स्वरूपाचा पाउस येतोय. तसेच उस्मानाबाद,जालना आणि लातूर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment