भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहरातील गरीब व गरजू नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्वाची कागदपत्रे म्हणजेच आधारकार्ड पॅनकार्ड या कागदपत्रांची मागणी करून तर काहींना कागदपत्रांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये अथवा सहा महिन्यांनी दुचाकी देण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या कागदपत्रांची फसवणूक करून त्यावर बँक व फायनान्स कंपन्यानंकडून कर्ज घेत दुचाकी काढून त्या परस्पर ५० ते ६० टक्के कमी किमतीला विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून यामध्ये तब्बल ३२ लाख रुपयांच्या ३३ दुचाकी जप्त करीत चार जणांच्या टोळीला अटक करण्यात यश मिळविले आहे अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली आहे.
या प्रकरणी शाह मोहम्मद आसिफ मोहम्मद आझम ऊर्फ बावटा यास ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या दुचाकीच्या शोरूममधून कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करीत अनेक दुचाकी ५० टक्के कमी किमतीत विक्री केल्याचे आढळले. त्याचे साथीदार अल्ताफ लतीफ शेख, शफिक अब्दुल लतीफ अन्सारी, अरबाज आसिफ मोमीन उर्फ देवा या चार जणांच्या मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातून तब्बल ३३ दुचाकी ६ मोबाईल असा एकूण ३२ लाख ३६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.