केपटाऊन (वृत्तसंस्था): दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. तिसरी आणि अंतिम कसोटी चौथ्या दिवशी ७ विकेटनी जिंकताना यजमानांनी २-१ अशा फरकाने फ्रीडम ट्रॉफीवर नाव कोरले. दोन्ही डावांमध्ये अर्धशतके ठोकणारा तिसऱ्या क्रमांकावरील कीगॅन पीटरसन (७१ आणि ८२ धावा) यजमानांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
२१२ धावांचे विजयी लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेला उर्वरित दोन दिवसांत आणखी १११ धावांची आवश्यकता होती. त्याच ८ विकेट शिल्लक असल्याने यजमानांना विजयाची संधी होती. त्यांनी केवळ एक विकेट गमावताना लक्ष्य साध्य केले. आयडन मर्करमला (१६) लवकर माघारी पाठवून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, पीटरसनसह कर्णधार डीन एल्गर तसेच रॉसी वॅन डर ड्युसेनने भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला.
पीटरसनने एल्गरसह दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करताना यजमानांचा विजय अधिक सुकर केला. एल्गरने ९६ चेंडू खेळून ३० धावा काढताना पीटरसनला चांगली साथ दिली. त्यानंतर रॉसी वॅन डर ड्युसेनसह तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावा जोडताना संघाला आणखी विजयासमीप आणले. चेतेश्वर पुजाराकडून जीवदान लाभलेल्या पीटरसनने ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावा करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. पॅव्हेलियनच्या दिशेने परतणाऱ्या पीटरसनचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहुन कौतुक केले. शार्दूल ठाकूरने घेतलेल्या विकेटने भारताच्या चाहत्यांना थोडा आनंद झाला तरी ड्युसेनने (नाबाद ४१) आणि टेम्बा बवुमासह (नाबाद ३२) चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही डावांमध्ये हाफ सेंच्युरी मारणाऱ्या कीगॅन पीटरसनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मालिकावीराचा बहुमानही त्यानेच मिळवला.
पहिल्या डावात भारताने २२३ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिकन संघाला २१० धावांमध्ये रोखून १३ धावांची नाममात्र आघाडी मिळवली. आघाडी फळी ढेपाळली तरी रिषभ पंतच्या नाबाद शतकाने भारताने यजमानांसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य निर्धारित केले. उपकर्णधार लोकेश राहुलसह मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारताच्या मालिका पराभवासाठी कारणीभूत ठरले.