
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने वडाळा पूर्व येथे नुरा बाजार ते शेख मिस्त्री दर्गा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या नियोजित रस्त्यामुळे १६८ घरे बाधीत होणार आहेत. त्यामुळे स्थानिक काँग्रेसचे नगरसेवक सुफीयान वनू यांनी या रस्त्याला विरोध केला आहे. दरम्यान त्यांनी या रस्त्याला एक पर्याय दिला असून त्यामुळे या रस्त्याचा पालिका प्रशासनाने पुनविर्चार करावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
मुंबई पालिकेने शहरातील ६८ रस्ते विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे, तर काँग्रेस नगरसेवक सुफीयान वनू यांच्या प्रभाग क्र.१७९ मधील एक रस्ता विकसित करण्यात येणार आहे. हा रस्ता नुरा बाजाराकडून सुरू होऊन पुढे शेखमिस्त्री दर्ग्याला मिळतो. परंतु या रस्त्याच्या विकासादरम्यान १६८ घरे बाधित होणार आहेत. दरम्यान या बाबत ऑक्टोबर २०२१ मध्ये या रस्त्याचा सर्वे देखील झाला असून या रस्त्यास आपला विरोध नाही. परंतु रस्त्याच्या विकासांतर्गत तेथील १६८ घरे बाधित होणार आहेत व ती तोडावी लागणार आहेत. जर हा रस्ता उजव्या बाजूला वळवून घेतला तर तेथील केवळ १० ते १२ घरेच बाधित होणार आहेत व तो थेट एस.एम.डी. या मुख्य रोडला मिळणार आहे. प्रशासनाने या मुळ प्रकल्पाचा पुनविर्चार करावा, अशी मागणी वनू यांनी आक्टोबर २०२१ मध्ये स्थापत्य समिती (शहर) च्या सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करताना केली होती.
हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, महापालिकेला काही तांत्रिक अडचणीमुळे रस्ता अग्रवाल वाडीहून न्यायचा असल्यास सर्व बाधित घरांचे पुनर्वसन अँन्टॉपहिल मध्येच करण्यात यावे, अशीही मागणी वनू यांनी केली आहे.