Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीविरारमध्ये हजारो लिटर पाणी वाया

विरारमध्ये हजारो लिटर पाणी वाया

फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्तीच नाही

नालासोपारा : विरारमध्ये खोदकाम करताना एक जलवाहिनी फुटली होती. त्याला सहा महिने उलटले तरी स्थिती अद्याप जैसे थेच आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय यानिमित्त विरारच्या नागरिकांना येत आहे.

विरारच्या अनेक भागात, विशेषत: पूर्वेकडील भागात अद्यापही पाण्याची समस्या गंभीर आहे. या भागातील अनेक मागासलेले पाडे आहेत, ज्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पालिकेचे पाणी पोहोचत नाही. तर दुसरीकडे विरार पश्चिमेला एक जलवाहिनी फुटली असून गेल्या अनेक महिन्यांपासून पालिका प्रशासनाला त्याचे भानच नाही. खोदकाम करताना फुटलेल्या या जलवाहिनीतील पाणी वाहून थेट गटारात जात आहे. आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. विशेष म्हणजे, याबाबत तक्रार करून देखील पालिकेने याची दुरुस्ती केलेली नाही.

विरार पश्चिमेतील रेल्वे फाटकानजीक सुमारे सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने रस्त्याचे खोदकाम केले होते. हे काम सुरू असताना रस्त्याखालील पाण्याची जलवाहिनी फुटली, तेव्हापासून आतापर्यंत अनेक महिने या जलवाहिनीतून पाणी वाहून थेट गटारात जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार देखील केली आहे. मात्र तरीही पालिकेकडून जलवाहिन्यांची दुरुस्ती केली जात नाही. पालिका प्रशासन पाणीप्रश्नाबाबत असा हलगर्जीपणा कसा करू शकते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -