चिपळूण : नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून गेली ५ वर्षे प्रभागातील बापट आळी, जुना भैरी ते नवीन भैरी मंदिर, स्वामी मठ ते रामतीर्थ तलाव, स्वामी मठ पाठीमागील रस्ता, सोनार आळी हे रस्ते पूर्ण व्हावेत म्हणून पालिकेत पाठपुरावा करत होते. तरीही आजपर्यंत या रस्त्यांचे काम सुरू झाले नाही. तत्काळ या रस्त्यांचे काम सुरू करावे, तसे न झाल्यास १४ जानेवारीपासून मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नगरसेवक सीमा रानडे यांनी दिला आहे.
सीमा रानडे म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील मोजक्याच नागरिकांसमवेत दि. १० जानेवारी रोजी सर्व संबंधित खात्यांना उपोषणाचे पत्र देण्यात आले. सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यांना मंजूरी मिळाली. शिवनदी ते वेसमारूती आणि नवीन भैरी ते जुना भैरी रस्त्याला ७ मे २०२१ रोजी वर्कऑर्डर मिळाली. २८ ऑक्टोबर २०२१ ला कामाचे भूमिपूजनही झाले. मी आतापर्यंत अनेक वेळा संबंधित ठेकेदारांकडे संपर्क साधला, पालिकेत पाठपुरावा केला तरीही काम चालू झाले नाही.
आता रस्त्याच्या कामाची मुदत संपत आहे. स्वामीमठ मागीलही रस्त्याची वर्कऑर्डर देवून भूमिपूजन झाले आहे तरीही काम चालू नाही. सोनारआळी थांबलेला रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी १ मार्च २०२१ रोजीच स्थायी समितीने मंजुरी दिली. तरीही गेले १० महिने पालिकेने टेंडर काढले नाही. स्वामी मठ ते रामतीर्थ रस्त्याला गेली २ वर्षे बांधकाम विभागातून तांत्रिक मंजुरी पालिका प्रशासनाला आणता आली नाही. आता या रस्त्यांची मुदत संपत आली. नाहीतर पुन्हा वाढीव काम फेरनिविदा या सगळ्यात रस्ते अडकतील, पुन्हा पावसाळा येईल आणि पुन्हा वर्ष जाईल, तोपर्यंत या रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण होईल, असे सीमा रानडे म्हणाल्या.