Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीपालघर

सतर्कतेमुळे अनर्थ टळला : पालकमंत्री भुसे

सतर्कतेमुळे अनर्थ टळला : पालकमंत्री भुसे

पालघर  : माहिम केळवे धरण ढासळल्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच आवश्यकतेनुसार एनडीआरएफचे पथक सुद्धा तैनात करण्यात आले होते. परिसरातील गावांमधील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची तयारी सुद्धा जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यामुळे अनर्थ टळला, असे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

झांझरोळी गावाजवळ माहिम केळवे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या धरणात गळती झाली होती. या गळती प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी केली व वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, आ. राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धरणाची गळती होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनला आपातकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात धरण अधिक सुरक्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सध्या धरणामध्ये २.४६ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ०.५० द.ल.घ.मी. पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवून २.०० द.ल.घ.मी. पाणीसाठा मार्च अखेरपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत धरणाच्या अन्य भागातून पाणी सोडण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, याविषयी काळजी घेण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

Comments
Add Comment