सोनू शिंदे
उल्हासनगर : अंबरनाथ येथील पालेगाव, जुना अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल बांधण्यात आली आहेत. मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. दिवंगत राकेश पाटील यांनी सतत ३ वर्षे पाणीटंचाईच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने केली होती. अखेर पाणीटंचाईचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिले आहे.
कर्जत महामार्गालगत असलेल्या पालेगाव, जुना अंबरनाथ गाव परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. या ठिकाणी सुमारे हजारो कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. संकुलात चांगले रस्ते, पथदिवे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज निवासी क्षेत्र आहे.
हजारो नागरिकांनी सदनिका खरेदी केल्या आहेत. मात्र स्थानिक पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही. अशा स्थितीत टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांवरही होत आहे. त्यामुळे या भागात पाण्याची टाकी बांधण्यासाठी स्थानिक बिल्डरांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जमीन मोफत दिली होती. असे असतानाही पाण्याच्या टाकीला पाइपलाइन जोडून परिसरातील नागरिकांसाठी पाण्याची समस्या सोडविण्याचे काम झालेले नाही.
दरम्यान तातडीने पाइपलाइन जोडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तीन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते व मनसे शहर उपाध्यक्ष दिवंगत राकेश पाटील यांनी निवेदने, पत्रव्यवहार, आंदोलने करून पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात मोठा वाटा उचलला होता. स्थानिक राहिवाशांच्या मदतीने रस्त्यावर उतरून आंदोलने, आमरण उपोषणे करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.
दरम्यान आरसी एमआयडीसी पाइपलाइनद्वारे पाणी टाकीपर्यंत नेले जाईल. त्यानंतर पाणी वाटप केले जाईल. तीन वर्षांपासून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. एकदा त्याची पाहणी केली जाईल तसेच आवश्यक तेथे दुरुस्ती व जोडणी करून महिनाभरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बासनगर यांनी सांगितले.