Sunday, June 8, 2025

पहिल्या दिवशी भारताची घसरगुंडी

पहिल्या दिवशी भारताची घसरगुंडी
दुसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार बदलला आणि संघाचे नशिबही फिरल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीत भारताने धडाकेबाज विजय मिळवला होता. पण दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघावर नामुष्कीची वेळ ओढवली. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि त्यामुळेच भारताला डाव २०२ धावांवर संपुष्टात आला.

भारताचा हंगामी कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर काही काळ राहुल आणि मयांक अगरवाल यांच्याकडून बरी फलंदाजी पाहायला मिळाली. या दोघांनी ३६ धावांची सलामी दिली आणि त्यानंतर मयांक अगरवालच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. मयांक बाद झाल्यावर भारताला एकामागून एक अजून दोन मोठे धक्के बसले. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही एकाच धावसंख्येवर बाद झाले आणि भारतीय संघाला मोठा हादरा बसला. अजिंक्यला यावेळी भोपळाही फोडता आला नाही, तर पुजाराला तीन धावाच करता आल्या. त्यानंतर या सामन्यात पहिल्यांदाच संधी मिळालेले हनुमा विहारी फलंदाजीला आला, पण त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही.

या धक्क्यांमधून भारतीय संघाला सावरण्याचे काम कर्णधार राहुल करत असल्याचे पाहायला मिळाले. राहुलने यावेळी आपले अर्धशतक झळकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलकडून यावेळी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुलला एकही धाव करता आली नाही. राहुलचा महत्वाचा बळी यावेळी मार्को जेन्सनने घेतला आणि संघाला मोठे यश मिळवून दिले.

राहुलला यावेळी ९ चौकारांच्या जोरावर ५० धावा करता आल्या. राहुल बाद झाल्यावर रिषभ पंतही जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. पंतला यावेळी १७ धावांवर समाधान मानावे लागले. पण यावेळी आर. अश्विन हा संघाच्या मदतीसाठी धावून आल्याचे पाहायला मिळाले. राहुल, पंत आणि त्यानंतर शार्दुल ठाकूरही बाद झाले असले तरी अश्विन मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून होता. पण अखेर मोटा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. अश्विनने यावेळी ५० चेंडूंमध्ये सहा चौकारांच्या जोरावर ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
Comments
Add Comment