
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, रिकामी मैदान समुद्रकिनारी जाण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. सुरूवातीला पोलिसांनी 7 जानेवारी 2022 पर्यंत जमावबंदी लागू केली होती आता कलम 144 (section 144 ) चा कालावधी पोलिसांनी 15 जानेवारी पर्यंत वाढवला आहे. याबाबतीत सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, ' 31 डिसेंबरच्या अनुशंगाने नागरिकांनी पँनिक होऊ नये. मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. घातपाताच्या अनुशंगाने सर्व मेजर काळजी घेण्यात आलेली आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलिस पथक, पोलिस ठाण्याना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.' नागरिकांनी घरी राहून यंदाचा 31 डिसेंबर साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.