
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन करताना आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या . त्यावरूच आता पुन्हा वाद पेटला आहे. याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ म्याऊ जाणीवपूर्वक केलं. कारण वाघाची मांजर झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
राणीबागेत असणाऱ्या त्या फलकाबद्दल आणि दर्ग्याबद्दल मुंबई महापालिकेने तसंच शिवसेनेने स्पष्टीकरण दिले पाहिजे असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच याच घोषणा देताना तिघे भाऊ 100 कोटी वाटून घेऊ असे फलकही भाजप नेत्यांच्या हातात दिसून आले. तसंच यावेळी नितेश राणे X शिवसेना नेते अनिल परब यांच्यातही जोरदार घमासान पहायला मिळाले.अनिल परबांच्या पोटात दुखलं मला विधानसभेत पुढे बसायला मिळाले म्हणून असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी
हिंदुच्या भावना दुखावल्या त्याबद्दल शिवसेनेने आधी माफी मागावी, नंतर बोंबलत बसावे, शिवसेना माफी कधी मागणार? अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. तसंच मी योग्य पद्धतीने काम करत आहे, माझ्या या कृतीने मला धीरुभाई अंबानींचे वाक्य आठवलं, ज्यावेळी तुम्ही योग्य करता त्यावेळी तुम्हाला जास्त विरोध होतो, म्हणूनच मला टार्गेट केले जात आहे, त्यामुळे मी आणखी आक्रमकतेने सरकारवर तटून पडणार असेही नितेश राणे म्हणाले आहेत. विविध मुद्द्यांवरून सध्या विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीला घेरण्याचे काम सुरू आहे. राज्यातली शेतकऱ्यांची वीजतोडणी या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन सुरू होते त्यावेळी ही घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. त्यावरून आता आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.