मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकारच्यादृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेत (Shivbhojan Thali Scam) मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे.
एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरुन सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेते पैसे लाटल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करुन देण्यासाठी शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार होतो. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ग्राहकांचा फोटो एकच पण नावे वेगवेगळी टाकून शिवभोजन थाळी योजनेतील अनुदान दलालांनी लाटले आहे. या माध्यमातून सरकारने आपल्या बगलबच्चांची सोय केली आहे. लहानग्यांना उपाशी ठेवण्याचं पाप केले आहे. गरीबांच्या हक्काचे भोजन दलालांच्या घशात कसे गेले, याची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि नेते यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.