वेंगुर्ला (प्रतिनिधी) : ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चारही नगर परिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याच ताब्यात राहणार आहेत. आम्ही या नुसत्या बढाया मारत नसून आमची तेवढी ताकद आहे. या बळावर आम्ही चारही नगर परिषदा जिंकणार आहोत’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठासून सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांवरून रविवारी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चारही नगर परिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याच ताब्यात राहणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे’, असा ठाम विश्वास नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘आम्ही या नुसत्या बढाया मारत नसून आमची तेवढी ताकद आहे. या बळावर आम्ही चारही नगर परिषदा जिंकणार आहोत’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठासून सांगितले.
वेंगुर्ला नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री राणे हे आले होते. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ‘त्यांनी यावे आणि या आमच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदा घेऊन जाव्यात, असे व्हायला काय आम्ही डोळे मिटून बसलो आहोत का?’, असा सवालच राणे यांनी उपस्थित केला. ‘शिवसेनेची ताकद काय आहे, चारही नगर परिषदा आमच्याकडे आहेत. त्या आमच्याकडेच राहणार. या निवडणुकांमध्ये सेनेचा धुव्वाच उडणार आहे’, असे राणे म्हणाले.
वेंगुर्ला नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावरही भाष्य केले. आमचे मित्र दीपक केसरकर हे मला आत्ताच ऑनलाइन दिसले; परंतु ते अशा प्रकारच्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये येत नाहीत, असे सांगतानाच आम्ही विकासाच्या कामात कधीही राजकारण पाहत नाही, असा टोलाही राणे यांनी केसरकर यांना लगावला.
‘आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करायचा हे आम्ही निवडून आल्यानंतर ठरवलेले होते. विमानतळाचे काम, मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अशी कामे आम्ही केली. या कामांशी तुमचा काय संबंध होता? तुम्ही कधी होतात?, या सर्व कामांचे आम्ही भूमिपूजन केले आहे. त्यालाही यांनीच विरोध केला. आता विमानतळही सुरू झाले आहे. तेव्हा आता हे म्हणतात की, ते आम्हीच तयार केले’, अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली.
—————–