
मुंबई शिवसेनाचा अंतर्गत वाद अखेर आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम म्हणाले की, , तीन चार महिन्यापासून माझ्या संदर्भात मीडिया संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु आहे. माझी भूमिका सर्वांना माहीत व्हावा म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही. मी त्यांच्या हॉटेलवरती बोललो म्हणून मी पक्षाच्या विरोधात बोललो नाही, असं ते म्हणाले. अनिल परबांनी मुंबईतून निवडून येऊन दाखवावं. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून ते राष्ट्रवादीच्या संजय कदमांना मातोश्रीवर घेऊन आले. मात्र उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यावर सुडाची भावनेनं काम केलं, असं ते म्हणाले.
रामदास कदम म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता म्हणून तो पाडला गेला. काही कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणा केली. त्यांच्या मागे कोण होतं हे मला माहित होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी कधीच किरीट सोमय्या यांच्याशी बोललो नाही. मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केलं नाही.
रामदास कदम म्हणाले की, संजय कदम यांना मी मोठं केलं. पण त्याने पक्ष सोडल्यानंतर भगवा झेंडा पायाखाली तुडवून जाळला. त्यांना आता हाताशी धरलं जात आहे. आमचे निष्ठावंत उदय सामंत यांना बोलावलं. आता आम्हाला त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागत आहे. अनिल परब शिवसेनेला गहाण ठेवत आहेत. मग गद्दार कोण आहे, असा सवाल त्यांनी केला. एसटी कर्मचारी संप सुरु आहे आणि आत्महत्या होत आहेत. पण अनिल परब यांना वेळ नाही. अनिल परब यांची भाषा अशी आहे की ते राष्ट्रवादी नेता म्हणून बोलत आहेत. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगत आहेत. 52 वर्ष आम्ही या पक्षासाठी खर्च केले आहे, असं ते म्हणाले.