पुणे : शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली, त्यावर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी कळस चढवला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.