NEW DELHI, INDIA - APRIL 7: Army Chief General Bipin Rawat with wife Madhulika Rawat during the prize distribution of Golf Tournament at Army Golf Club, Dhuala Kuan on April 7, 2018 in New Delhi, India. (Photo by Raajessh Kashyap/Hindustan Times via Getty Images)
भारतीय संरक्षण दलाचे पहिले प्रमुख म्हणून ज्यांना सन्मान मिळाला त्या जनरल बिपीन रावत यांनी दिलेला शब्द जीवनाच्या अखेरपर्यंत कधी मोडला नाही आणि जोडलेले नाते कधी तोडले नाही. मग ते देशाशी असो, की सैन्य दलाशी किंवा त्यांच्या पत्नीशी…
दि. १४ एप्रिल १९८६, सोमवार. अशोका रोड, नवी दिल्ली. कॅप्टन बिपीन रावत हे बारातींसह मधुलिका यांच्या अशोका रोडवरील घरी पोहोचले. बँड वादन आणि मित्रमंडळींनी चालवलेल्या जल्लोशात बिपीन यांनी घरात प्रवेश केला. बरोबर रात्री बारा वाजता पंडितजींनी म्हटले, ‘अब वधू-वर की गाँठ बांध दिजिए…’ वधूच्या बहिणींनी बिपीन यांच्या अंगावरील शालीची मधुलिका यांच्या साडीच्या पदराशी गाठ बांधली. अग्नीच्या साक्षीने सात फेरे झाले. पंडितजी म्हणाले, ‘अब दोनों सात जन्मों के साथी हो गए है…’
दि. १० डिसेंबर २०२१, शुक्रवार. दिल्ली आर्मी कँटोन्मेंट. छत्तीस वर्षांनी पुन्हा दिल्लीत. यावेळी मिलिटरी बँड होता. शोक धून वाजवली जात होती. बिपीन व मधुलिका यांच्या मोटारी फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. लष्कराच्या वतीने त्यांना सतरा तोफांची सलामी देण्यात आली. पुन्हा मंडप होताच आणि साक्षीला अग्नीही. पण यावेळी पंडितजींनी म्हटले, तारिणी व कृतिका दोघींनी आपल्या मातापित्याला मुखाग्नी देण्यासाठी यावे…
लग्नाच्या दिवशी दोघांनी शपथ घेतली सात जन्म एकत्र राहण्याची. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते दोघे एकत्र राहिले. अन्त्यसंस्कारासाठी दोघांसाठी दोन वेगळ्या चिता सजवलेल्या नव्हत्या. एकाच चितेवर दोघांचे अन्त्यसंस्कार झाले. संरक्षण दलाच्या सेवेत असतानाच त्यांना मृत्यूने कवटाळले आणि पती-पत्नी दोघेही बरोबर असतानाच एकाच वेळी जग सोडून गेले.
जनरल रावत हे यापूर्वी मृत्यूच्या दारातून दोन वेळा परत आलेत. अठ्ठावीस वर्षांपूर्वी त्यांना पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात गोळी लागली होती आणि सहा वर्षांपूर्वी ते एका हेलिकाॅप्टर अपघातातून बचावले होते. १९९३ मध्ये बिपीन रावत हे ५-११ गोरखा रायफल्समध्ये मेजर पदावर काम करीत होते. १७ मेची घटना आहे. काश्मीरमधील उरी परिसरात ते अन्य जवानांसमवेत गस्त घालत होते. नेमके त्याच वेळी पाकिस्तानी सैन्याकडून त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू झाला. गोळीबाराच्या रेंजमध्ये रावत नेमके सापडले. एक गोळी नेमकी गुडघ्यावर लागली आणि ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना श्रीनगर इस्पितळात नेण्यात आले. पण या गोळीबारात जखमी झालेल्या रावत यांना आपले पुढे काय होईल, या विचाराने ग्रासले होते. सीनिअर कमांड फोर्समध्ये आपल्याला कायम ठेवतील की नाही, या प्रश्नाने त्यांच्या मनात कल्लोळ निर्माण केला होता. उपचारानंतर कुबड्या घेऊन ते चालत होते. महिन्याभरात ते बरेही झाले. बिपीन रावत यांनी दाखवलेले धाडस पाहून त्यांना सन्मानपदक देण्यात आले.
सन २०१५ मध्ये ते लेफ्टनंट जनरल होते. त्यांच्यावर नागालँड दिमापूर येथील ३ कॉर्प्स मुख्यालयाची जबाबदारी होती. दि. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते स्वतः एक कर्नल व दोन वैमानिकांना बरोबर घेऊन हेलिकाॅप्टरने निघाले. हेलिकाॅप्टरने जमिनीवरून आकाशात झेप घेतली आणि वीस फूट उंचीवर असतानाच इंजिनमध्ये बिघाड झाला. काही सेकंदातच हेलिकाॅप्टर जमिनीवर कोसळले. सर्व जण जखमी झाले. बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा मृत्यूवर मात केली. नियमित उड्डाण करणाऱ्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले.
दि. ९ डिसेंबर २०२१, हेलिकाॅप्टर दुर्घटनेत रावत व त्यांच्या पत्नीला मृत्यूने गाठलेच. सुलूर येथून वेलिंग्टनकडे जात असताना हेलिकाॅप्टरने अचानक पेट घेतला व कोसळले. त्यांच्यासमवेत अन्य बारा जणांचाही मृत्यू झाला. ते वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ काॅलेजमध्ये भाषण देण्यासाठी निघाले होते. जिथे हेलिकाॅप्टर उतरणार होते, तेथून अवघ्या सोळा किमी अंतरावर ते कोसळले.
कशाची व कोणाचीही पर्वा न करता चीनला थेट आव्हान देणारा आणि पाकिस्तानला दुष्ट राष्ट्र म्हणून संबोधणारा हा योद्धा होता. त्यांच्या धाडसापुढे ड्रॅगनही बिथरला होता. आम्हाला उत्तेजित करू नका, आमच्या वाट्याला जाऊ नका, अशी चीनने प्रतिक्रिया दिली होती. दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी जनरल बिपीन रावत यांनी भारताच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका चीनकडून आहे, असे म्हटले होते. गेल्या वर्षापासून भारत-चीन सरहद्दीवर लाखो भारतीय सैनिक आणि शस्त्रसाठा तैनात करण्यात आला आहे. तो कधी माघारी बोलवणार, हे कोणीच सांगू शकत नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रावत यांच्या वक्तव्यानंतर दोन देशांत ताणतणाव वाढेल, असे म्हटले होते. बिपीन रावत हे चीन व पाकिस्तानवर उघडपणे भाष्य करायचे, त्याबद्दल दोन्ही देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
दि. १५ एप्रिल २०२१ रोजी रावत रायसिना संवादात म्हणाले, माय वे ऑर नो वे… अशी चीनची भूमिका असते. पण भारत त्याविरोधात मजबुतीने उभा आहे. कोणताही दबाव आम्ही मान्य करणार नाही किंवा आम्हाला मागे हटवता येणार नाही.
दि. ८ एप्रिल २०२१ रोजी विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात जनरल रावत म्हणाले, चीन भारतावर सायबर हल्ले करणार असेल, तर भारतानेही आपली डिफेन्स सायबर सिस्टिम मजबूत करण्याच्या कामात लक्ष केंद्रित केले आहे.
जानेवारी २०१८ मध्ये लष्करप्रमुख असताना रावत यांनी म्हटले होते, चीन शक्तिमान असेल, तर भारतही कमजोर नाही. भारत आपल्या सीमेवर चीनला आक्रमण करू देणार नाही. आता १९६२ प्रमाणे परिस्थिती नाही. प्रत्येक क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे.
सप्टेंबर २०१७ मध्ये लष्करप्रमुख असताना रावत यांनी म्हटले होते, चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी भारताने सज्ज असले पाहिजे.
बिपीन रावत यांच्या जाण्याने भारतीय सैन्य दलात आत्मविश्वास निर्माण करणारा, सैन्य दलाच्या आधुनिकीकरणाला गती देणारा, पाकिस्तानला कापरे भरवणारा आणि ड्रॅगनला आवाज देणारा धाडसी योद्धा भारताने गमावला.
sukritforyou@gmail.com
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…