थांबू नका, हार मानू नका

  107

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे


अनेकदा सासर खूप चांगलं मिळालं म्हणून, घरच्यांनी लवकर लग्न ठरवलं म्हणून, अथवा प्रेमविवाह केला म्हणून महिलांचं शिक्षण अर्थवट अपूर्ण राहते. एकदा संसारात गुंतल्यावर मग त्याबद्दल काही वाटेनासे होते. महिला स्वतःला घर एके घर या पिंजऱ्यात बंद करून घेते. एकदा मुलं मोठी झाली, संसारातील नवीन नवलाई संपली की, आपण कोण आहोत, आपली ओळख काय, बाहेरील जगात काय सुरू आहे, आपल्याला समाजात कोण कोण ओळखतं, काय म्हणून ओळखतं, हे प्रश्न मनाला सतावू लागतात.


घरातल्याशी मला काहीतरी करावंसं वाटतंय! या विषयावर बोलायला गेलं, तर अनेकदा असे पाहिले आहे की, तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जास्तीत जास्त उत्तर मिळतं की, काही कमी पडतंय का तुला? सगळं तर आहे तुझ्या मनासारखं, या वयात काय करणार आहेस आता? कोण तुला उभं करेल बाहेरच्या जगात? घराकडे दुर्लक्ष व्हायला नकोय, मुलांना पूर्ण वेळ तुला देणं आवश्यक आहे. हे वाढीचे नाजूक वय असतं मुलांचं, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं कोण पाहणार? आला गेला, पै-पाहुणा कोण बघणार? सणवार व्यवस्थित होणे महत्त्वाचे आहे. आजवर तर सगळं तूच केलंस, तुला ते सगळं व्यवस्थित जमतं या कामासाठी, तुझी घरात जास्त गरज आहे, त्यामुळे नको ते खूळ डोक्यातून काढून टाक, असा सल्ला दिला जातो.



मुळात लग्नाच्या आधीच काही गोष्टी विशेषतः करिअर बाबतीतले आपले विचार आणि निर्णय ठामपणे व्यक्त करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी लग्नानंतर मुलींना नोकरी सोडायला सांगितले जाते. भविष्यात नोकरी करण्याबाबत विचारल्यास लग्नानंतर बघू, करू, मुलं मोठी झाल्यावर करू, असं म्हणता-म्हणता स्त्री आयुष्यभर या रहाटगाडग्यातून बाहेर पडू शकत नाही.



कालांतराने स्वतःच शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय इतकंच नाही, तर महिला स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत, राहणीमान, सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी याबद्दल देखील अतिशय निरुत्साही झालेल्या दिसतात. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून घेणे, आता आपण कधी काहीच करू शकणार नाही, अशी भावना मनात निर्माण होणे आणि त्यातून स्वतःला कोसत राहणे, कुढत राहणे अथवा इतरांना, परिस्थितीला, नशिबाला दोष देत राहणे, अशा गोष्टी महिलांमध्ये उदयाला येतात.



खरंतर, आपण रोज नव्याने आयुष्य सुरू करू शकतो, कोणत्याही क्षणी नवीन कार्याची, कामाची, दिनचर्येची सुरुवात करू शकतो, फक्त त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली आवश्यक आहे. समुपदेशनमार्फत आपण अनेक महिलांना अशा प्रकारे संसार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या सांभाळून देखील स्वतःला आत्मिक समाधान, आनंद मिळण्यासाठी आवडीचे उपक्रम, उद्योग, छोटे व्यवसाय, सामाजिक कार्य, छंद, समाजात मानसन्मानाचे स्थान, स्वतःचे कार्यकर्तृत्व सिद्ध करण्याचे विविध उपाय यावर चर्चा करून त्यांना कोणत्याही वयात स्त्री भरारी घेऊ शकते, याबद्दल मार्गदर्शन करीत असतो.



घरच्यांना विश्वासात घेऊन, त्यांचं सहकार्य मिळवून, कोणतेही नातेसंबंध न दुखावता, न दुरावता देखील आपण आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी, आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी, आपल्यातील आत्मसन्मान, स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्याने कशा प्रकारे अॅक्टिव्ह राहावे, स्वतःला आनंदी, फ्रेश आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व कसे बनवावे यावर चर्चा करीत असतो. आयुष्य कोणत्याही वळणावर बदलू शकते, तुम्ही ध्यास घेतला, दृढ निश्चय केला, तर अशक्य काहीच नसते, हे महिलांना पटवून देणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच स्वतःला अनेक कुचकामी कारण आणि सबबी देऊन अडकवून घेतलेले लक्षात येते. त्याच-त्याच रुटीनमधून, रोजच्या त्याच बहाण्यांमधून बाहेर पडणे ठरवलं, तर अतिशय सोपं आहे, फक्त कोणीतरी योग्य दिशा दाखवणे आवश्यक असते. इतर महिलांनी देखील अशा प्रकारे काहीतरी करू पाहणाऱ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महिलांना आपल्यात सामावून घेणे, त्यांना आत्मविश्वास देणे, त्यांना संधी देणे आवश्यक आहे.



प्रत्येक स्त्रीला स्वतःची ओळख होणे, आपली क्षमता जाणून घेणे, स्वतःला बाहेरील जगाशी संपर्कात राहण्याचा मूलभूत अधिकार नक्कीच आहे. त्यामुळे घरातल्या लोकांनी देखील तिला फक्त कामवाली म्हणून गृहीत न धरता, तिचा विविध अंगांनी विकास कसा होईल, तिचं मनोधैर्य आबाधित कसे राहील, तिला तिच्या आयुष्यात समाधान कशात मिळेल, यावर विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
‘स्त्री शिकली, प्रगती झाली’ इतकंच म्हणून उपयोग नाही, तर स्त्रीला तिच्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ देखील घेता आला पाहिजे. युवतींना, महिलांना फक्त त्यांच्या समाधानासाठी थोडं फार शिक्षण देणे इतकंच अपेक्षित नसून त्यासोबतच त्यांना स्वतःसाठी जगण्याचे, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, थांबू नये, हार मानू नये, यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत राहणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
meenonline@gmail.com

Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने