Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

जाचक कारवायांविरोधात एसटी कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा

जाचक कारवायांविरोधात एसटी कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा

पालघर : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी पालघर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ३६ दिवस होत आले, मात्र पालघर विभागातील बससेवा सुरळीत झालेली नाही.



परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी कामावर हजर व्हा, असा अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र, तरीदेखील कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ५२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


पालघर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी पालघर आगार ते विभागीय कार्यालय पालघर असा मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोईसर, पालघर, सफाळे, नालासोपारा, वसई, जव्हार, अर्नाळा, डहाणू येथील संपकरी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. नियमांचे उल्लंघन न करता एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र वापरत असून बेकायदेशीररीत्या निलंबन, बडतर्फी तसेच निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने एसटी कर्मचारी या कारवायांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.



या मोर्चाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटीने केलेल्या बेकायदेशीर कारवायांचा
निषेध व्यक्त करण्यात आला असून या मोर्चात एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि लहान बालकांचाही समावेश पाहायला मिळाला. हजारोच्या संख्येने एसटी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते.



एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण केल्यास दोघांचा फायदा होईल-दशरथ मोरे, पालघर, एसटी कर्मचारी


आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारला असून एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण केल्यास कर्मचारी व प्रवासी या दोघांचा फायदा होईल. न्यायालयाने आमचा दुखवटा म्हणजेच संप बेकायदेशीर ठरवला नसतानाही एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे निलंबन व बडतर्फी केली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या बदल्याही केल्या आहेत. या सर्व कारवाया तातडीने मागे घ्याव्यात. - दशरथ मोरे, पालघर, एसटी कर्मचारी
Comments
Add Comment