
नाशिक (प्रतिनिधी) : राहुल गांधींच्या ‘मी हिंदू’ या वक्तव्याची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली असून, देशांत हिंदूंचे सरकार आणायचे आहे, या राहुल गांधींच्या वक्तव्यावर, ‘मग आता काय आफ्रिकन लोक राज्य करत आहेत का?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदू सत्तेबाहेर आहेत. या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून हटवून हिंदूंना सत्तेवर आणायचे आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधींच्या या वक्तव्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. दरम्यान देशात आता काय आफ्रिकन लोकं राज्य करत आहेत का? असा मिश्कील सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
आम्हाला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला भीत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून ‘सत्ता’ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. मात्र, हिंदुत्ववादी भीतीत जगत असतात, असे राहुल गांधींनी म्हटले होते. राहुल गांधींच्या या हिंदुत्ववादी विधानावरून राज ठाकरे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.