नवी दिल्ली : तब्बल 378 दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी शेतकरी आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
“संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन स्थगित केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. आंदोलनाच्या यशाचा जल्लोष शनिवारी सर्व धरणेस्थळावर, टोल नाक्यांवर केला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चा यापुढे आणखी मजबूत केला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाची पुढील बैठक 15 जानेवारी रोजी दिल्लीत होणार आहे. आंदोलन स्थगितीची घोषणा करताना संयुक्त किसान मोर्चाने डॉक्टर, वकील, सोशल मिडिया, माध्यमं, कलाकार यांचे आभार मानले आहेत. तसेच आंदोलनाच्या यशाचं श्रेय शहीद शेतकऱ्यांना समर्पित करण्यात येत आहे.”, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय सदस्य संदीप आबा गिड्डे पाटील यांनी दिली आहे