Wednesday, February 19, 2025
Homeमहत्वाची बातमी“न्यायालयाने ‘मविआ’ सरकारला कितीही फटकारले तरी..”

“न्यायालयाने ‘मविआ’ सरकारला कितीही फटकारले तरी..”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महाविकासआघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका

मुंबई : “न्यायालयाने मविआ सरकारला कितीही फटकारले तरीही गेंड्यालाही लाज आणेल इतक्या निब्बर कातडीच्या या सरकारवर त्याचा जराही परिणाम होत नाही.” असे ट्विट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

कोरोना महामारीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने केवळ मदत जाहीर केली, मात्र प्रत्यक्षात कुणालाही मदत मिळाली नाही, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, विविध मुद्य्यांवरून न्यायालयाकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला.

तसेच, “संवेदनाशून्य मविआ सरकारने कोरोनासारख्या भीषण संकटात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले, यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची अतोनात परवड झाली. या सरकारच्या ढिम्म कारभारामुळेच महाराष्ट्रातील १ लाख ४० हजारांपेक्षा अधिक नागरिक कोरोनाला बळी पडले; परंतु सरकारला याची जराही लाज वाटत नाही.” असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

“कोरोनामुळे निधन पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा आदेश झाला आहे, अशा मदतीसाठी तब्बल ३७ हजार गरजू कुटुंबांनी राज्य सरकारकडे अर्ज दाखल केले आहेत. बोलघेवड्या मविआ सरकारने केवळ दाखवण्यापुरती मदत जाहीर केली, परंतु कोणालाही प्रत्यक्षात मदत केली नाही.” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.

याचबरोबर, “इतर अनेक प्रकरणांप्रमाणेच आता सर्वोच्च न्यायालयाने याही बाबतीत ढिम्म सरकारवर ताशेरे ओढले आहेत, पण कुठल्याही बाबतीत न्यायालयाने मविआ सरकारला कितीही फटकारले तरीही गेंड्यालाही लाज आणेल इतक्या निब्बर कातडीच्या या सरकारवर त्याचा जराही परिणाम होत नाही.” असे चंद्रकांत पाटील ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -