Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीज्येष्ठांची संख्या वाढल्याशिवाय माथेरानमध्ये पर्यटनाला गती मिळणे अशक्य

ज्येष्ठांची संख्या वाढल्याशिवाय माथेरानमध्ये पर्यटनाला गती मिळणे अशक्य

मुकुंद रांजाणे

माथेरान : माथेरानसारख्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असतात; परंतु वाहतुकीचे योग्य पर्याय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसारख्या पर्यटकांची संख्या रोडावलेलीच असते. त्यामुळे माथेरानमध्ये ज्येष्ठ पर्यटकांची संख्या वाढवल्याशिवाय पर्यटनाला गती मिळणे अशक्य आहे, असे स्पष्ट मत अनेक पर्यटकांनी व्यक्त केले आहे. तसेच माथेरानच्या पर्यटनामध्ये केवळ ई-रिक्षाच क्रांती करू शकते, असेही पर्यटक म्हणतात.

मागील काही वर्षांपासून माथेरान हे केवळ एकदिवसीय पर्यटनस्थळ बनल्याने स्थानिकांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना तोंड देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्यातील स्वस्त आणि मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे हे ठिकाण असले तरीसुद्धा सुट्ट्यांच्या हंगामाव्यतिरिक्त अन्य दिवशी पर्यटक इथे सुरक्षित आणि स्वस्तात वाहतुकीची व्यवस्था नसल्याने एकाच दिवसात आपला मुक्काम हलवतात. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याकारणाने इथे अंतर्गत प्रवासासाठी मोटार वाहनांना बंदी आहे. घोडा आणि हातरिक्षा यांचा आधार घेऊन पर्यटकांना मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीपासून गावात येताना खूपच खर्चिक बाब ठरते.

वयस्कर पर्यटकांना त्याचप्रमाणे दिव्यांग, अपंग यांनासुद्धा या स्थळाचा आनंद उपभोगण्याची प्रबळ इच्छा असतानाही केवळ वाहतुकीची समस्या असल्यामुळे त्यांना या सुंदर स्थळापासून मुकावे लागत आहे. माथेरानला वयस्कर मंडळी आल्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन दिवस राहता येऊ शकत नाही. त्यांनाही इथल्या पर्यटनस्थळाचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी स्वस्त दरात वाहतुकीची एकमेव सुविधा म्हणजे ई-रिक्षा हाच पर्याय उपलब्ध होऊ शकतो. येथील श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदेंनी मागील दहा वर्षांपासून इथे शासनाने ई-रिक्षा सुरू करून वयस्कर पर्यटकांना तसेच दिव्यांगांना शालेय विद्यार्थ्यांना सहज प्रवास करता यावा, यासाठी पाठपुरावा केला आहे आणि लवकरच ही समस्या प्रगती पथावर आहे. अल्पावधीतच इथले संपूर्ण रस्ते एमएमआरडीएच्या माध्यमातून क्ले पेव्हर ब्लॉकमध्ये करण्यात येत आहेत. त्यामुळे ई-रिक्षाची चाचणीसुद्धा लवकरच करण्यात येणार असल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजते. दरम्यान, याठिकाणी जोपर्यंत वयस्कर पर्यटकांची संख्या वाढत नाही तोपर्यंत इथल्या पर्यटनाला गती मिळणे अशक्य असल्याचे पर्यटकांसह सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

पर्यावरणपूरक ई-रिक्षांची गरज

पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने इथे ज्येष्ठ पर्यटकांची संख्या वाढणार आहे. यातून आपसूकच निदान दोन दिवस तरी पर्यटक आपल्या लवाजम्यासह मुक्कामी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. धूळविरहित रस्त्यांवरून आबालवृद्ध मंडळी मनमोकळेपणे बाजारात खरेदी करू शकतात. याच रस्त्यांमुळे सध्या ज्याप्रमाणे जागोजागी दुर्गंधीचे साम्राज्य पाहावयास मिळते, ते
संपुष्टात येणार आहे.

चार दशकांपूर्वी आमचे आई-वडील याठिकाणी येऊन गेले आहेत. इथला निसर्ग आजही त्यांना आकर्षित करतो आहे. इथली स्वच्छ, प्रदूषणमुक्त हवा आणि शांत वातावरण हे अन्य कोणत्याही ठिकाणी अनुभवयास मिळत नाही. आजही त्यांना माथेरानला यायची खूप इच्छा आहे; परंतु इथली वाहतूक व्यवस्था खिशाला न परवडणारी आहे. दिल्लीप्रमाणे बॅटरी रिक्षा चालतात, त्या इथेही सुरू केल्यास आमच्या ज्येष्ठ आई-वडिलांना पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो. – औदुंबर सोनटक्के, पर्यटक, मुंबई

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -